औरंगाबाद-महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर भाष्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी विधान करताना अजबच वक्तव्य केले आहे.
देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून आणि महागाईवरून रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण यावर काही बोलणे योग्य नसल्याचे दानवे म्हणाले.”पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरून दोष देणे हे चुकीचे आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाहीत, त्यामुळे किंमती वाढलेल्या आहेत.” असे दानवे म्हणाले.
गोखलेंचे वादग्रस्त वक्तव्य: “महागाई काय मोदींनी वाढवली का?
महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का? असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत हा उलट प्रश्न केला आहे.
विक्रम गोखले यांनी महागाईच्या प्रश्नावर म्हटले की, अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का? एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे राहायला हवे. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही. असे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.