पुणे-खासदार संजय राऊत यांच्यावरील ED ची आजची कारवाई हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अल्टिमेट असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.एकीकडे न्यायालयात शिवसेनेची काही प्रकरणे प्रलंबित असताना हा इशारा बरेच काही बोलून जाणारा आहे असेही मानले जाते आहे. परंतु या सर्व राजकीय स्थितीत शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, पवार आता संजय राऊत यांच्या पाठीशी कसे उभे राहतात ? किंवा काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहणार आहे, नवाब मलिक ,अनिल देशमुख यांच्या प्रकारांने देखील पवारांची राजकीय वर्तुळातील शक्तीस्थळे कमजोर ठरल्याचे बोलले जाते.
संजय राऊत हेच शिवसेनेचे टायगर
संजय राऊत लोकांमध्ये जाऊन, राज्यभेत आणि माध्यमांसमोरही भाजपविरोधी भूमिका जोरदारपणे मांडत आहेत. सध्या संजय राऊत हेच शिवसेनेचा माध्यमातील आक्रमक चेहरा आहे. केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात ते सातत्याने बोलत आहेत. तयामुळे राऊत यांना अटक झाल्यास शिवसेनेचा विरोधाचा आवाज बंद होईल.संजय राऊत यांच्यानंतर थेट उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनाच माध्यमांसमोर भूमिका मांडायला यावं लागेल. कारण सध्या संजय राऊत यांच्याशिवाय इतर कोणताही नेता आक्रमकपाने भूमिका मांडत नाही.
राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका–
येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप कायमच आक्रमक राहिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरता येईल आणि त्याचा राजकीय फायदा भाजपला उचलता येईल.
मराठी माणसांवरच कारवाई ,भाजपामध्ये गेल्यास कारवाई स्थगित
संजय राऊत यांच्या कारवाईनंतर भाजपकडून मराठी माणसांवर कारवाई केली जाते. भाजपकडून कसं सुडाचं राजकारण केलं जात आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अशा प्रकारे दबाव टाकला जातो, अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते.दोन दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेकडून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला गेला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे त्यावर प्रतिक्रिया म्हणाले की, हा मराठी माणसांचा, मराठी मातीचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांनी माफी मागायला हवी.सध्या शिवसेनेकडून संजय राऊत हे मराठी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली, अशी भूमिका शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे मराठी कार्ड येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून वापरलं जाणार आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपबरोबर गेलेल्या नेत्यांपैकी प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु होती.अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाताना ईडीच्या चालू असलेल्या कारवाईमूळे प्रवेश केला, असं स्पष्टपणे सांगितलं होतं.सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या अनिल परब, संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसोबत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. संजय राऊत यांची चौकशी हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अल्टिमेट असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.