महाविकास आघाडीने अक्षरशः २३ गावांचा डीपी देखील पळवावा या सारखी दुर्दैवी घटना नाही – हा काळा दिवस
पुणे- २३ गावांचा समावेश महापालिकेत करायचा ,तिथे सोयी सुविधा महापालिकेला करायला लावायच्या आणि महापालिका त्याचसाठी आराखडा तयार करण्याचा पवित्रा घेताच आपण त्यात ढवळाढवळ करत महापालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण करत हा आराखडाच महापालिकेला करू न देता अन्य मार्गे करायचा निर्णय घ्यायचा म्हणजेच विकास आराखडाच पळवून न्यायचा हि सर्वात दुर्दैवी बाब असून या सरकारचा यामागील हेतू तपासण्याची गरज आहे .महानगरपालिकेच्या मूलभूत अधिकारांवर राज्य सरकारने घाला घातला आहे. महापालिकेच्या इतिहासातील आजचा हा काळा दिवस आहे. कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेतला जाईल.असे आज महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना सांगितले . २३ गावांच्या विकास आराखड्या साठी उद्या महापालिकेची मुख्य सभा होत असताना आजच राज्य सरकारने विकास आराखडा करण्याच्या कामासाठी पीएमआरडीए ने समिती करून आराखडा करावा असा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली . महापालिकेत भाजपची सत्ता आहे आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे . या पार्श्वभूमीवर विकास आराखडा करताना भाजपचे वर्चस्व राहू नये एवढेच नव्हे तर आराखडा करताना आपल्याच मर्जीने तो करता यावा हा खटाटोप यांचे सारे कारस्थान उघडे पाडील असेही बिडकर यांनी म्हटले आहे.