पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच फोटो शेअर केला आहे.
‘हे शब्दांच्या पलिकडचे दु:ख आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जातील. त्यांचे इतर कार्यही कायम स्मरणीय राहील’, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
भारत सरकारने पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. ‘जर 125 वर्षांचे आयुष्य मिळाले तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल’ असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते. मात्र वयाच्या शंभरीजवळच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे संपूर्ण नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असे असून, त्यांचा जन्म 29 जुलै 1922 ला झाला. पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचे जीवन इतिहास आणि संशोधनासाठी समर्पित केले होते. 2019 मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्राशी नाते अतूट होते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना “शिवशाहीर” म्हणतात. त्यांनी आतापर्यंत शिवचरित्राबरोबरच 50 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते.