पुणे,(प्रतिनिधी) :
शाही अभ्यंग स्नान, नवे कपडे जोडीला फराळाचा आस्वाद आणि मुबलक फटाके उडविताना जीवनात ‘आपलेही कुणीतरी आहे’, हा भक्कम आधार अनुभवत ‘त्यांनी ‘ दिवाळीचा आनंद लुटला.
निमित्त होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेवक श्रीकान्त पाटील आणि सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रमातील मुलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी उपक्रमाचे. ‘ स्पर्श अनाथ आश्रमा’ त झालेल्या या उपक्रमात प्रारंभी मुलांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यानंतर नवे कपडे परिधान करून या मुलांनी फराळाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मनसोक्त फटाके उडविण्याचा आनंद लुटताना ते हरखून गेले. नवे कपडे, मिठाई, फराळ आणि फटाके अशा शाही सरंजाममुळे ‘आपलेही कुणीतरी आहे ‘ हा भाव या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर दिसला. या उपक्रमात सादिक शेख, नाजिम मणियार, अनिताताई बहिरट,दिलशाद आत्तार, वसुधाताई निरभवणे, पुष्पाताई निघोजकर, ज्योतीताई बहिरट, सीमाताई कदम, नसीम पिरजादे, अख्तरी शेख आदींसह पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक श्रीकान्त पाटील म्हणाले की, तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत,
हा आधार देताना या मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.
समाजाप्रती आपलेही कर्तव्य असते या भावनेतून ज्यांना कुणीही नाही ,अशा अनाथांसह दुर्लक्षित घटकांसाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
- श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक