पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांचा गौरव सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रम
पुणे : राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण देश पातळीवर होत असून केवळ ७ ते ८ बँका रहाव्या, असे रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या मनात आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम नागरी सहकारी बँकांनी करावे. सहकार हा महाराष्ट्राच्या विकासाचा पाया आहे, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे पुण्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, सचिव संगिता कांकरीया यांसह संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमात असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक विद्याधर उर्फ बाळासाहेब अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक प्र.दी. उर्फ आबासाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नागरी बँकांच्या कामकाजात भरीव योगदान देणा-या नंदा लोणकर, पुष्पलता जाधव या दोन संचालिकांचा कै.मीराताई देशपांडे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अजित पवार म्हणाले, देशात राष्ट्रीयकृत, खासगी, परदेशी, नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. मात्र, नागरी सहकारी बँकेबाबत बदनामी केली जाते. येथे चुका करणारे लोक आहे, असा समज पसरविला जातो. आजच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये घोटाळ्याची ३७६६ प्रकरणे असून गुंतलेली रक्कम ६४ हजार ५०९ कोटी इतकी आहे. तर, नागरी सहकारी बँकांमध्ये २२० कोटींच्या घोटाळ्याचे वृत्त मोठया प्रमाणात देण्यात आले. प्रत्यक्षात देशात नागरी बँकामध्ये घोटाळ्याची १८१ प्रकरणे असून १२७ कोटी ७० लाख रुपये इतकी रक्कम आहे. खासगी बँकांमध्ये ५ हजार ५०० कोटी तर परदेशी बँकांमध्ये १ हजार कोटी रुपयांचे घोटाळे आहेत. या कोणत्याही गोष्टीचे मी समर्थन करीत नाही. परंतु सहकारी बँकेंबाबत दाखविले जाणारे चुकीचे आहे. काही चुका घडतात. परंतु त्यातून गरीबांना अडचणी निर्माण होऊ नये, असे प्रयत्न बँकांनी करायला हवा.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे सहकारातील एक प्रगत राज्य म्हणून देशात ओळखले जाते. सहकार चळवळ टिकली व वाढली पाहिजे. सहकारी बँकासमोर आव्हाने आहेत, त्यावर मात करण्याची ताकद देखील आपल्यात आहे. त्यामुळे ही चळवळ जास्तीत जास्त लोकाभिमुख व ग्राहकाभिमुख करायला हवी. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनला मावळ भागात प्रशिक्षण केंद्राकरीता हव्या असलेल्या जागेबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, सहकाराला ११० वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. राज्याचा सामुहिक विकास होण्यामागे सहकाराचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्र टिकून राहण्याकरीता यामध्ये काम करणा-यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात चांगले बदल देखील व्हायला हवेत. महिला व युवा वर्गाचा सहभाग या क्षेत्रात वाढविण्याकरीता सहकार प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, राजकारणात सहकार अपेक्षित आहे. मात्र, सहकारात राजकारणात नको, हे वाक्य प्रत्येकाने आपल्या मनावर बिंबविले, तर सहकारात उत्तम कार्य करता येईल, असेही ते म्हणाले.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनची स्थापना १९७९ साली झाली. सलग ४२ वर्षे सहकारात शिक्षण व प्रशिक्षणाचे काम असोसिएशनतर्फे सुरु आहे. सहकार कायदा व बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट व इतर कायद्यांमध्ये वेळोवेळी बदल होतात. त्याबाबत व परिणामांबाबत मार्गदर्शन करण्याचे काम असोसिएशन करीत आहे. सहकार कायद्यातील बदलांबाबत ठोस तरतुदी व्हाव्या, अशी मागणीही त्यांनी केली.
असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. गेल्या तीन वर्षात एनपीए व्यवस्थापनात उत्कष्ट कामगिरी करणा-या वीस नागरी बँकांचा गुणगौरव आणि गेल्या तीन वर्षात असोसिएशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेणा-या सहा नागरी बँकांचा सन्मान देखील कार्यक्रमातझ् झाला.