सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि.१ : – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागात ५ लाख घरे

गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते. अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक क्रांतिकारक, साहित्यिकांसह रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटूही या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्याला होते. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती. परंतु त्यातून मार्ग काढला. पुढील 36 महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच 2010 पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे. कामाठीपुरा व कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, अनेक विकासाचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमाफी या शासनाने दिली.समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड, स्कायवॉक, मोनोरेल ही कामही वेगाने सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या असून या पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे त्यामुळे दूर झाले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या विकासात श्रमिकांचा मोठा वाटा आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे व मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही.

वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, मुंबईतील विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. कोस्टल रोड सह अनेक विकास कामे मुंबईत प्रगतीपथावर आहेत.आणि या शासनाचा प्रत्यक्ष कृतीवर भर असून आज होत असलेला समारंभही त्याचेच द्योतक आहे. सर्वांचे गृह स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रलंबित विकासकामांची आम्ही माहिती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि आज होत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ हा त्याचाच भाग आहे. बीडीडी चाळींना एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. येथे पुनर्वसनानंतर नवीन इमारती बांधल्या जातील. यातील एका चाळीचे संवर्धन करावे व त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे. जेणेकरून भावी पिढ्यांना या चाळींचा इतिहास जाणून घेता येईल.येत्या 36 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पात 9 हजार 689 पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून केवळ घरेच नाही तर इतर सुविधाही देण्यात येणार आहे.

गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेला हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. गेल्या दीड वर्षात दहा हजार लोकांना लॉटरी पद्धतीने म्हाडाने हक्काचे घर दिले आहे. पारदर्शकता व विश्वासार्हता ही म्हाडाची ख्याती आहे.बीडीडी पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे .या आणि आगामी सर्व प्रकल्पांमध्ये आरोग्य केंद्र आणि इतर सुविधाही देण्याचा शासनाचा विचार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली. त्याचप्रमाणे लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे घर’ अशा पद्धतीचा उपक्रम राबविला जावा.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते “चाळींतले टॉवर” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड,अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक,वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, , पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील पाटील,  मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर,खा. अरविंद सावंत,खा.राहुल शेवाळे,आ. सदा सरवणकर,आ.अजय चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, माजी मंत्री सचिन अहिर,माजी आ.सुनील शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी केले तर म्हाडा मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई, दि....

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...