पुणे : सैनिक देशाचे आणि देशांच्या सिमांचे रक्षण करतात, त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मात्र, कोणता देश बलशाली आहे, हे केवळ सैनिकांच्या शक्तीवर नाही. तर, त्या देशातील संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरते. गुणवत्ता असलेल्या नागरिकांची संख्या ज्या देशात असते, तो देश ख-या अर्थाने शक्तीशाली असतो. भारतात संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्कारित नागरिक घडविण्याचे काम उत्तमपणे सुरु असल्याचे मत रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघप्रमुख अॅड.प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ, कल्पना जाधव, अॅड.प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, डॉ.मिलिंद भोई, कुमार रेणुसे, राजू परदेशी, अरविंद कोठारी, केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठचे अध्यक्ष पीयुष शाह, कसबा गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि बाल गौरव पुरस्कार सिने नाटय बालअभिनेता शर्व दाते यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प.पू.स्वामी स्वरुपानंद सरस्वती (फुलगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
अॅड.प्रशांत यादव म्हणाले, संस्काराचे पंख घेऊन माणूस जन्माला येत नाही. त्याला आई-वडिलांकडून संस्कार मिळतात. तपश्चर्येने प्रत्येक माणूस देवत्वाकडे पोहचू शकतो. त्याची सुरुवात संस्कार वर्गांतून होत असते. ख-या अर्थाने माणसातील संस्कारदीप प्रज्वलित करण्याचे काम संस्कार वर्ग करीत आहेत. स्वरदा बापट म्हणाल्या, आजकाल मोबाईल, टिव्ही शिवाय लहान मुले जेवण देखील करीत नाहीत. तेव्हा अशा संस्कार केंद्राचे महत्व व जबाबदारी वाढत आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा दुष्परिणाम वाढत असून लहान मुलांना चांगले नागरिक बनविणा-या संस्कार केंद्रामध्ये वाढ व्हायला हवी.
पुरस्काराला उत्तर देताना पीयुष शाह म्हणाले, मुलांच्या हातात मोबाईल आल्याने काळ बदलला आहे. त्यामुळे संस्कारांसोबतच गुड टच बॅड टच सारख्या संकल्पना मुलांना समजावून सांगायला हव्यात. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चैत्राली सरमहाले, मयुरेश कथवटे, समिधा चव्हाण, यश कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी, ईश्वरी वनारसे, वज्रा जगताप, शिवाजंली हिरेमठ यांनी विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळविण्याचा मान मिळविला.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल दिवाणजी, वसुधा वडके, अनघा दिवाणजी, सुप्रिया कुलकर्णी, सारिका पाटणकर, समृद्धी प्रभुणे, तेजश्री कडू, शिल्पा पिंगळे यांनी केले. संस्कार वर्गातील विविध उपक्रमांना जयश्री प्रभुणे, संगिता ठकार, बसवराज कलादगी, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत, समिक्षा सोनवणे, तनिष्का सोनवणे, रुपेश कुलकर्णी, जयेश वडके, अथर्व सरमहाले आदी उपस्थित होते.