जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे तर्फे सोलापूर भूषण, पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : संगीत, कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान लोक कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान समाजातील विविध स्तरांतून होतो, हे महत्वाचे आहे. सामाजिक विकास व उन्नतीचे कार्य करणारे हे गुणवंत आपल्या ध्येयवादी कृतीशीलतेने समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक आरोग्य राखतात, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे तर्फे पद्मावती जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, इंडस सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज इंडियाचे सीईओ अजित वाळे पाटील, चेतना जाठवडेकर, अॅड.शार्दुल जाधवर, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील, अभय ऐतवडेकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर भूषण पुरस्काराने ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले, शिल्पा फलफले, रोहित साठे, सोनाली कदम, सचिन कदम, सचिन चव्हाण, महेश भोरे, अभिनेत्री निता देव, काशिनाथ भतगुणकी, विजयसिंह चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शिंदेशाही पगडी, एस.पीज फूडतर्फे खाद्यपदार्थांची भेटवस्तू, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
पुण्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या लिज्जत पापडचे सुरेश कोते, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राहिबाई पोपरे, रुक्मीणी भोसले, मृदुला काळे, युवा अभिनेते आशुतोष पाटील, सिनेनाटय लेखिका माहेश्वरी पाटील चाकुरकर, सिनेनाटय निर्माते अविनाश कोलते, सौंदर्यवती स्वाती हणमघर, विनायक देव, ममता तायडे, सिनेनाटय क्षेत्रातील प्रितम पाटील, स्वप्ना कुलकर्णी-राठोड, वसंत जगताप, कीर्तनकार ह.भ.प. नेहा साळेकर, चेरी टूर्सच्या संस्थापिका अर्चना नवघरे यांना पुणे रत्न कार्यवैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, एस.पीज फूडतर्फे खाद्यपदार्थांची भेटवस्तू, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुरस्कार दिल्यानेच प्रत्येकजण काम करतो असे नाही. मात्र, सामाजिक ॠण व्यक्त करणा-यांना सन्मानीत करणे आपले कर्तव्य आहे. सुख-दु:खाच्या धाग्याने महावस्त्र तयार होत असते. तेच पांघरुन प्रत्येकजण स्वत:साठी आणि काहीजण समाजासाठी कार्य करतात, त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे.
शहाजीराव पाटील म्हणाले, शून्यातून कष्ट करुन आज जे स्वत:च्या पायावर उभे आहेत. त्यांना प्रकाशझोतात आणून त्यांच्या कार्याला चालना देण्याकरीता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. पुरस्कार वितरणासोबतच महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठमोळा वाद्यवृंद – गर्जा सुवर्ण महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहात पार पडल्याचे त्यांनी सांगितले. फाऊंडेशनच्या शोभा पाटील, सुशिला निंबाळकर, भाऊसाहेब निंबाळकर, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अॅड.शार्दुल जाधवर, सचिन पाटील, सुरेखा जाधवर, केशरनानी घाडगे, शैलेंद्र पाटील आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले.