पंढरपूर- एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केलाय. तर दुसरीकडे पंढरपूरच्या नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय. चंद्रभागेच्या तीरावर होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झालेत. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिलाय.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करत नागरिकांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. येणाऱ्या काळात यावरून वाद पेटण्याची शक्यताय.वाराणसी आणि उज्जैनच्या धरतीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्याची घोषणा सरकारने केलीय. या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे आणि दोनशे दुकाने पाडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यापारी धास्तावलेत. त्यांनी या कॉरिडॉरला विरोध सुरू केलाय. प्रशासनाने याबाबत हरकती, सूचना मागवल्या. विकास आराखडा तयार केला. मात्र, या साऱ्या कामात आम्हाला विश्वासात घेतला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पंढरपूर बचाव समितीने याविरोधात आंदोलन छेडलेय.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केलीय. त्यासाठी तीनशे कोटींचा निधी राखून ठेवल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघेही खर्च करणार आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या कामांच्या धर्तीवर येथे काम होणाराय. पंढरपुरातल्या गल्ल्या, रस्ते, घाट, मठ, मंदिरे, पालखी मार्ग, चंद्रभागा तीराचा विकास करण्याचा मानसय.
पंढरपूर कॉरिडॉरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 1500 कोटींच्या ऑनलाइन निविदा मागविल्यात. त्यासाठी उद्या 26 डिसेंबर पर्यंत निविदा भरता येणारायत. या निविदा 29 डिसेंबर रोजी उडण्यात येणारात. टाटासह तब्बल 15 कंपन्यांनी या कामात उत्सुकता दाखवलीय. त्यामुळे विरोधी तीव्र होताना दिसतोय. यापू्र्वी नागरिकांनी मोर्चा काढत विरोध केला. आताही नागरिकांनी आपली दुकाने, घरांवर काळे फलक लावत निषेध सुरू केलाय.