मुंबई -केंद्राकडून कृत्रिमरित्या महागाई वाढवली जाते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. तसेच, महागाईमुळे जनतेवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. केंद्र सरकारला लाज वाटत नाही अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. तसेच, त्यामुळे या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष 31 मार्चपासून 7 दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे पटोले म्हणाले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सिलिंडरसह पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याविरोधात 31 मार्जपासून काँग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 31 मार्चपासून पुढे 7 दिवस काँग्रेसतर्फे महागाई सप्ताह पाळला जाणार असून गाव, तालुका, जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
या राज्यव्यापी आंदोलनात जिल्हाप्रतिनिधीसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होतील. आंदोलनाच्या माध्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरे रूप जनतेसमोर आणणार, असेही नाना पटोले म्हणाले.
136 दिवसांत दरवाढ का केली नाही?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका असताना 136 दिवस केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह इतर वस्तुंच्या दरात एकदाही दरवाढ करण्यात आली नाही. मात्र, निवडणुका संपताच केंद्र सरकारकडून सामान्यांना लुटले जात आहे.