सहकारनगरमधील रहिवाश्यांचा विरोध
पुणे- भाजपची सत्ता असलेल्या स्थायी समितीने बिल्डरधार्जिना एका ठरावाद्वारे आवश्यकता नसतानाही सहा मीटर रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय भरडला जात आहे. असा आरोप आज येथे राष्ट्रवादी च्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला. आणि या संदर्भातील आपला आक्षेप आज नगरसेविका अश्विनी कदम यांच्या समवेत सहकारनगरमधील रहिवाश्यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे नोंदवला.
सत्तरच्या दशकामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील पुणेकरांनी आपले छोटेसे घर असावे या उद्देशाने सर्व आयुष्यभराची पुंजी लावून सहकारनगर भागांमध्ये छोट्या -छोट्या जागा घेऊन हौसेने आपली घरे बांधली होती.पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे त्यांच्या घरे रस्ता रुंदीने बाधित होऊन भविष्यात त्यांची घरे नाॅन-बिल्डेबल होऊ शकतात.यामुळे या प्रस्तावाच्या
विरुद्ध एकत्र येत सहकार नगर नंबर 2 मधील क्रांती,स्वातंत्र्यवीर सावरकर, सन्मित्र,सागर, स्वानंद सोसायटी या परिसरातील नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवून त्यासंदर्भातील आपला आक्षेप आज नगरसेविका अश्विनी कदम यांच्या समवेत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे नोंदवला.