पुणे- ‘पुणे तिथे काय उणे म्हणतात’ ,तसा इथे राजकारणाच्या कुरघोड्यांचा इतिहास आहे . स्वर्गीय बाळासाहेबांनी पुण्यातून मुंबईत पाय रोवले आणि सेनेचा झेंडा तिथून महाराष्ट्र भर फडफडविला. नंदू घाटे, काका वडके,रमेश बोडके अशा नामांकीतांनी सेनेचा झेंडा पुण्यात चौफेर फिरविला .सेनेचे बोट पकडून भाजपने आपले प्रस्थ निर्माण केले हा इतिहास आहे पण आता पुण्यात आमचेच विद्यमान आठ हि आमदार आहेत असे सांगून सेनेला काखोटीला बांधून पुणे कायमचेच जणू धनुष्यबाणमुक्त करण्याचे मनसुबे रचले जात आहेत . अर्थात राज्यात जर युती झाली तर पुण्यातून सेनेला उमेदवारी द्यायचीच नाही हि भूमिका ठाम पणे राबविणे भाजपला तसे सोपे जाणारे नाही .पण तसे झाले तर पुण्यातून सेनेला किंवा सैनिकांच्या खच्चीकरणातला तो मुख्य पाया ठरेल आणि सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न पुण्यात निर्माण होईल यात शंका नाही .
युती झाली तर सेनेला जागा सोडणे अपरिहार्य ठरणार आहे हे नक्की . पण आता जागा कोणत्या सोडायच्या यावर देखील राजकीय कुरघोड्या होतील यात नवल नाही .
पुण्यातील आठ पैकी ५ मतदार संघातून प्रामुख्याने चांगले सैनिक सेनेकडे विधानसभेसाठी असल्याचे दिसते आहे . यातील क्रमवारी नुसार सांगायचे झाले तर हडपसर ,खडकवासला,पर्वती ,वडगाव शेरी आणि कसबा अशी या मतदार संघाची नावे आहेत . हडपसर मधून प्रामुख्याने प्रमोदनाना भानगिरे आणि माजी आमदार ,माजी उपमहापौर असलेले महादेव बाबर यांच्यात उमेदवारी साठी रस्सी खेच आहे . यातील बाबर यांना दोन वेळा पक्षाने विधानसभेसाठी संधी दिलेली आहे आणि एकदा ते उपमहापौर हि झालेले आहेत . अर्थात काही काळ त्यांनी सत्तेतील पदे घेतल्याने त्यांच्या बाबत संमिश्र वातावरण आहे .अशा ज्येष्ठ नेत्याशी उमेदवारीसाठी स्पर्धा करत असलेल्या भानगिरे यांच्या कामाची पद्धत ,आंदोलनांचा धडाका यामुळे तरुणांचा मोठा वर्ग ,आणि नगरसेवक म्हणून त्यांनी वाढविलेला जनसंपर्क पाहता या मतदार संघातून त्यांना क्रमांक 1 ची पसंती शिवसैनिक आणि सेनेला मानणाऱ्या वर्गातून दिली गेली तर नवल वाटायला नको . हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात भाजपच्या आमदारांनी कोणतीही कामे केली नाहीत सर्व कामे प्रलंबित असून केवळ कोट्यावधी रुपयाची आकडेवारी सांगितली जाते प्रत्यक्षात कामे झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. असा प्रहार नुकताच माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला.तर हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास कामे रखडलेली असताना शिवसेना संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना घरी बसविणार, असा इशारा उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी नुकताच दिलाआहे.एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याबरोबरच शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्याला त्यांची जागा दाखवणारअसा सूर येथील सैनिकातून व्यक्त होत असताना हा मतदार संघ विद्यमान आमदाराच्या वादग्रस्त कारकीर्दीमुळे कदाचित भाजप सहजपणे सेनेला सोडण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .पण असे झाले तर सेनेचा कमकुवत उमेदवार इथे दिला जाईल या दृष्टीने स्थानिक भाजप नेते प्रयत्नशील राहतील आणि त्याला सेनेचे नेते किती भुलतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
असाच प्रश्न काही कमी अंशाने खडकवासला मतदार संघातून देखील उपस्थित होतो आहे . भाजपने सोडला तर प्रथम सेनेला हडपसर सोडेल असे सांगितले जात असताना दुसऱ्या मतदार संघाचे नाव घेतले जाते तो म्हणजे खडकवासला मतदार संघ . येथून भाजपचे विद्यमान आमदार दोन वेळा निवडून आलेत . पण या मतदार संघात सेनेला किंवा शिवसैनिकांना फारसा आधार न देता त्यांचे खच्चीकरण करण्याचेच राजकारण झाले. एकीकडे निरुपद्रवी म्हणून प्रतिमा असलेल्या विद्यमान आमदारा बाबत नाराजी असण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांनी आपल्या मतदार संघातून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दुसरी फळीला देखील बळ देण्याचे काम केले नाही असाही आरोप होतो आहे.
पर्वती मतदार संघातून सेनेच्या अस्तीत्वाचा तेवढाच प्रश्न आहे . पण इथे केवळ नगरसेवक बाळा ओसवाल हे इच्छुक यशस्वी लढा देवू शकतात असे ठामपणे सांगितले जाते आहे .त्या खालोखाल वडगाव शेरीतून संजय भोसले यांनी आपली मोट बांधली आहे तर कसब्यातून नवा उमदा तरुण म्हणून विशाल धनवडे हा सैनिक दमदार लढत निर्माण करू शकतो असे दिसते आहे . अर्थात युती झालीच तर हडपसर आणि खडकवासला हे २ मतदार संघ तरी भाजपला सोडावे लागतील असे सांगितले जाते आहे . आणि नाहीच झाली तर या पाच हि मतदार संघातून हे पाच हि शिलेदार सेनेच्या भगव्याचे शक्ती स्थळ ठरतील असे आजचे चित्र आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत युतीची बोलणी अद्याप जाहिररीत्या सुरू झाली नसली, तरी ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’वर खलबते सुरू आहेत.तशीच खलबते पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्येही होत आहेतच . त्यातच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचा भाजपचा या वेळी निकराचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची युती केली, तरीही त्यातून भाजप पावणेदोनशे ते दोनशे जागा लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करायची असली, तरी त्यांच्याशी तडजोड करायची नाही, अशी भूमिकाbभाजपचे काही नेते घेत असल्याचे वृत्त आहे.असे असताना ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे वृत्त पसरल्याने सेना आणि भाजप चे राजकारण या विधानसभा निवडणुकीत कोण कोणते आणि कसे रंग उधळणार हे पाहणे समीक्षकांच्या दृष्टीने औत्सुक्याचे ठरणार आहे