नागपूर -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा बदल योग्य बदल आहे. पण फक्त माफी मागून चालणार नाही. तर आपण व्यवहारात या सगळ्या वर्गाच्या संबंधिची भूमिका कशी घेतोय, यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. मोहन भागवत यांनी काल नागपुरात झालेल्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजाने भूतकाळातील चुकांबद्दल पापक्षालन करायला हवे असं म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
इतिहासात समाजात सामाजिक विषमतेला धरून जे काही घडले आहे, त्याबाबत आज आपण माफी मागितली पाहिजे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान माझ्याही वाचनात आले. समाजातील एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाणीव व्हायला लागली. हा बदल योग्य आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाच्याबाबत भूमिका कशी घेतो यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.