पुणे, १४ ऑक्टोबर २०२२ : एखाद्या मूक कार्याला लोकमान्यता मिळते, तेव्हा तो क्षण साजरा करण्यासारखा असतो. ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ची सीएसआर शाखा असलेल्या ‘मुकुल माधव फाउंडेशन’ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी श्रेणीतील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा क्षणही साजरा करण्याचाच होता. एका सार्वजनिक मतदान प्रक्रियेमध्ये ‘मुकुल माधव फाउंडेशन’ला २५ लाखांहून अधिक मते मिळाली, त्यानंतर नामवंत व्यक्तींच्या ज्युरी पॅनेलने विचारविनिमय केला आणि या संस्थेला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला गेला. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील विविध नागरिक आणि संस्था यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात येते. व्यवसाय, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञानातील नवकल्पना, प्रशासन, साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, नाट्य आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या क्षेत्रांत यश मिळविणाऱ्यांचा हा सत्कार सोहळा असतो.
असुरक्षित, उपेक्षित समुदाय आणि व्यक्तींसोबत ‘मुकुल माधव फाउंडेशन’ तळागाळात काम करीत आहे. या वंचित घटकांना उत्कर्षासाठी आवश्यक असलेली संसाधने मिळवून देणे व त्यातून त्यांचे सक्षमीकरण करणे असे या कामाचे स्वरूप आहे. या कार्याचा हा पुरस्कार म्हणजे गौरव आहे. या कामातून आरोग्यसेवा, शिक्षण, समाजकल्याण, पाणी आणि पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, आपत्ती निवारण, क्रीडा आणि कौशल्य विकास या सामाजिक मुद्द्यांवर परिणाम घडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
या पुरस्कारावर भाष्य करताना ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया म्हणाले, “मुकुल माधव फाऊंडेशन या आमच्या सीएसआर भागीदारासोबत आमचे संबंध किती उत्तम रितीने विकसीत झालेले आहेत, याची साक्ष म्हणजे हा पुरस्कार आहे. आमचा दृष्टीकोन आणि आमची उद्दिष्टे या संस्थेच्या समाजोपयोगी कार्याशी व्यवस्थित जुळतात. महाराष्ट्रातील, आणि त्यापलीकडे जाऊन समाजातील, प्रत्येक घटकामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही एकत्रितपणे करीत असतो.”
‘मुकुल माधव फाऊंडेशन’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, “आम्ही ज्या व्यक्ती आणि समुदायांसोबत काम करतो, त्यांच्याकडे या पुरस्काराच्या निमित्ताने सर्व समाजाचे लक्ष जाईल, अशी आम्हाला आशा वाटते. त्यांची उन्नती होते आणि ते आनंदाने,
सन्मानाने जगू लागतात, तेव्हाच आम्हाला मोठे बक्षीस मिळालेले असते. आमच्या या समाजकार्याच्या प्रवासात सतत सहभाग आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्व भागधारकांचे व स्वयंसेवकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत.”