मुंबई- संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता, असे राणे म्हणाले आहेत. ती एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका देखील केली. संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.
या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. संजय राऊत हे १९९२ मध्ये शिवसेनेत आले त्याआधी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायचे, असं राणे म्हणाले. संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या पत्रकारितेपासूनच्या प्रवासावरुन भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर २६ वर्षांनी राऊत शिवसेनेत आले असं म्हणत टोला लगावला. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली.
“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग लोकप्रभाला गेले,” असं म्हणत नारायण राणेंनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पुढे बोलताना राणेंनी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिल्याचा उल्लेखही केला. “संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असा टोलाही राणेंनी लगावला.
शिवसेना, बाळासाहेबांचा आशिर्वाद याबद्दल बोलणारे संजय राऊत हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर २६ वर्षांनी पक्षात आल्याचं सांगत आम्ही निधी गोळा करुन शिवसेना उभारल्याचा उल्लेखही नारायण राणेंनी केला. “तू आलास कधी? शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला. शिवसेना बांधताना आम्ही पैसे गोळा केले. आम्ही ऐवढं केलं म्हणून आता सत्ता आहे. राऊतांचे शिवसेना भवनाच्या उभारणीत त्याचे ५ पैसे तरी आहेत का? कोणाच्या कनाफाटात मारली संजय राऊतने असं कुठे, कधी वाचलं का? उसनं अवसान कशासाठी?” असा एकेरी उल्लेख करत राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. ज्यापद्धतीने राऊत बोलत होते, आव्हान देत होते ते करण्यासाठी तशी रग लागते, रक्त लागतं तसं असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.
भाजपा विरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोपांमध्येही काही तथ्य नाहीय, असं सांगतानाच आरोप खरे असतील तर पत्रकार असणाऱ्या संजय राऊतांनी पुरावे सादर करावेत असं आव्हान नारायण राणेंनी केलंय.