नियोजन फसण्यास लोकप्रतिनिधी जबाबदार :अतिक्रमण खात्याचे दुर्लक्ष
पुणे- सातारा रस्त्यावरील सदगुरू शंकर महाराज उड्डाणपुलावर आज एसटीचा भीषण अपघात झाला. एसटीचा ब्रेक फेल झाल्याने तीन ते चार दुचाकीस्वारांना एसटीने उडवले. तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्याचे दिसून येत आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
संजय माणिकराव कुर्लेकर, वय ५२ वर्षे, राहणार १२, आर.एफ. कमांड हाँस्पिटलच्या मागे, वानवडी, असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते नोकरी करतात आपल्या दुचाकी (अँक्टिव्हा नंबर सीजी ४३७२) वरुन ते चालले होते. गाडीवर जात असल्याने एसटी बसने दिलेल्या धडकेत कुर्लेकर यांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्ता रुंदीतील अनेक अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी, अस्तित्वातील बीआरटी आणि भविष्यातील मेट्रोचा विचार न करता राष्ट्रवादीच्या स्वतःला मातब्बर म्हणविणाऱ्यानी हा उड्डाणपूल निव्वळ स्वार्थ डोळ्यापुढे ठेऊन उभारल्याचा सातत्याने आरोप होत आला. मतांच्या पेटी साठी आणि स्वतःच हस्ते परहस्ते उभारलेली अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी कसलाही विचार न करता हा उड्डाण पुला उभारल्याचा त्यांच्या वर सातत्याने आरोप होत आला आहे. पूर्वी बालाजी नगर विश्वेश्वर बँक चौक येथे होणारे अपघात आता चव्हाण नगर कमानी जवळ ढकलण्याचा प्रयत्न या द्वारे झाल्याचे बोलले जाते.अहिल्या देवी चौक ते चव्हाण नगर कमान आणि एकूणच पूल उतरण्याच्या दोन्ही बाजू अपघात स्थळे बनू लागली आहेत.
सातारा – स्वारगेट बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) ही सातारा येथून सकाळी पुण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एसटी बस धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलावरुन जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला हँन्ड लाँक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान बालाजीनगर परिसरात कायम गर्दी असते. त्यामुळे उड्डाणपूलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सहकारनगर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी क्रेनच्या साह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा रस्त्यावरील उड्डाण पूल आणि बीआरटी चे नियोजन फसण्यास लोकप्रतिनिधी जबाबदार
सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज च्या दरम्यान चे उड्डाण पूल असो बीआरटी चे नियोजन असो या बाबी आणि वाहतुकीचे नियोजन फसण्यास तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि त्यांनी केलेला हट्ट जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांनी केला . प्रत्येक कामात ठेकेदारांना त्रास देणे, भावी काळात येऊ घातलेल्या मेट्रो सारख्या योजनांचा विचार न करणे, रस्ता रुंदीतील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी प्रश्नातील अधिकाऱ्यांना त्रास देणे अशा घटनांमुळे सातारा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन फसल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे. पूर्वी सातारा रस्ता अपघातांचा रस्ता म्हणूनच ओळखला जात होता. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी बीआरटी च्या नावाने हा रस्ता रुंदीकरण करून मोठा केला आणि अपघातांची मालिका कमी कमी होत गेली.मात्र बालाजीनगरच्या परिसरात राष्ट्रवादीच्या काहीजणांनी खोडा घातला त्यामुळे विश्वेश्वर बँक चौकातील अपघातांची मालिका थांबली नाही तरीही येथील रुंदीकरण करायचे नाहीच हि भूमिका घेऊन येथे उड्डाणपूलाची संकल्पना मांडली गेली आता उड्डाण पूल आणि खालचा रस्ता दोन्ही कडे वाहतूक वाढते आहे, उड्डाण पुलावरून खाली येणारी वाहने आणि खालून जाणारी वाहने यांच्या धडक होण्याचे अपघाती स्पॉट येथे तयार झाले आहेत. हे भविष्यात अर्थातच अत्यंत जीवघेणे बनतील असा दावा करण्यात येतो आहे.
अतिक्रमण खात्याचे दुर्लक्ष
असे असतानाही चव्हाण नगर ते भारती विद्यापीठ या मार्गावर ब्रिजच्या खाली रस्त्याच्या बाजूला असलेली वर्षानुवर्षाची अतिक्रमणे हटविण्यास महापालिकेला सातत्याने अपयश आले आहे.पोट भरण्यासाठी रस्त्यावर परराज्यातून आलेली हि मंडळी आता गरीब राहिलेली नसली तरी त्यांची अतिक्रमणे देखील त्यांच्या सारखीच गलेलठ्ठ् झालेली आहेत. पण महापालिकेच्या अतिक्रमन विभागाने याकडे राजकीय दबावापोटी लक्ष घालणे सोडून दिलेले आहे.