- ‘रिपाइं’नेते एम. डी. शेवाळे यांच्या स्मृतींना अभिवादन.
पुणे, दि. ३ जून: “रिपब्लिकन पक्षाला एकत्र ठेवण्यामध्ये शेवाळे सरांचा वाटा मोठा होता. आंबेडकरी चळवळीत हजारो कार्यकर्ते घडविण्याचे काम त्यांनी केले. बहुजनांच्या विकासासाठी विविध संस्थांच्या माध्यामातून सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई यांच्यासह रिपब्लिकन चळवळीच्या कार्याला सुरुवात केलेले शेवाळे सर ‘रिपाइं’ला जोडले गेल्याने पक्षाला उभारी मिळाली. शेवाळे सरांनी मला तीस वर्षे एकनिष्ठ साथ दिली. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाचा शिलेदार हरवला आहे,” अशी भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय कोषाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे स्मरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या अभिवादन सभेला खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, माजी मंत्री अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी आमदार उल्हास पवार, ऍड. जयदेव गायकवाड, दिलीप कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भूपेश थुलकर, राजाभाऊ सरोदे, ‘रिपाइं’ प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, सचिव महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संगीता आठवले, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा’ हा मंत्र शेवाळे सरांनी स्विकारला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवाळे सरांनी नवीन पायंडा सुरु केला. उपेक्षित, दलित, गरिब मुलांना कमीत कमी खर्चात शिक्षण कसे देता येईल असा सातत्याने प्रयत्न त्यांच्या शिक्षण संस्थेतून होत होता. शेवाळे सरांनी स्वत:च्या मुलीचे लग्न विदर्भातील मुलाबरोबर करुन पुणे आणि विदर्भाचे मनोमिलन करण्यामध्ये पुढाकार घेतला. केवळ श्रद्धांजली किंवा अभिवादन सभेला एकत्र न येता इतर वेळीसुद्धा रिपब्लिकन पक्षातील लोक ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी शेवाळे सरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.”
गिरीश बापट म्हणाले, “अभिवादन सभेसारखे कार्यक्रम मनाला वेदना देणारे असतात. आयुष्यभर समाजासाठी काम, कार्यकर्ते घडविण्याची धडपड, कायम पक्षाची चिंता शेवाळे सर करत असत. एखादी व्यक्ती आयुष्यात नसेल तर तीची किंमत उशीरा कळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करुन त्यातून निष्पन्न होणार्याअ गोष्टींची जाण आणि योग्य सुचना सल्ला देणारा माणूस आपल्यात नाही.”
डॉ. राजेंद्र गवई, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, उल्हास पवार यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शेवाळे सरांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.

