नवी दिल्ली – वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या ट्विटरवरुन दिली आहे.
लखीमपूर खेरीला जाताना प्रियंका गांधी रविवारच्या घटनेबद्दल बोलल्या आणि म्हणाल्या, “ज्या प्रकारे या देशात शेतकऱ्यांना तुडवले जात आहे, माझ्याकडे शब्द नाहीत. कित्येक महिन्यांपासून शेतकरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकार ऐकायला तयार नाही. आजची घटना दर्शवते की हे सरकार शेतकऱ्यांना तुडवण्याचे राजकारण खेळत आहे. आणि हा देश शेतकऱ्यांचा देश आहे”.त्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या यूपी पोलिसांच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी घराबाहेर पडून गुन्हा करत नाही. मला फक्त प्रभावित कुटुंबांना भेटायचे आहे आणि त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे. मी काय चूक करत आहे? आणि जर मी काही चूक केली असेल, तर तुम्हाला [यूपी पोलीस] ऑर्डर, वॉरंट असायला हवे. तुम्ही [यूपी पोलीस] मला थांबवत आहात, पण कोणत्या कारणासाठी?
प्रियंका गांधी आज तिकुनियातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी जाणार होत्या. मात्र, आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात झालेल्या संघर्षामुळे प्रियंका यांना लखनौमध्येच रोखण्यात आलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं. मात्र, त्यांनी पायी घरातून बाहेर पडत चालायला सुरुवात केली आणि नंतर कारमधून पुढे निघाल्या. यूपी काँग्रेसच्या ट्विटर हँडलनुसार, लखनौहून लखीमपूर खेरीच्या मार्गावर टोल प्लाझावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि पोलिस रस्त्यावर ट्रक उभे करून कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना रोखत होते.
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी यांच्याविरोधात लखीमपूर खिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात एक कार घुसली आणि यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ शेतकरी जखमी झाले. दुसरीकडे भारतीय किसान युनियन यांनी दावा केला आहे की, या दुर्घटनेत ३ शेतकरी मारले गेले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर परतत असताना त्यांच्यावर वाहनाने हल्ला करण्यात आला, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाचाही हल्लाबोल
या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.