मुंबई-कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी अकरा वाजता भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आरोपींच्या अटकेशिवाय शांतता शक्य नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.आणि हि विनंती त्वरित मुख्यमंत्री यांनी मान्य केली आहे .
आंबेडकर म्हणाले, बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी या यादीतील लोकांना आम्ही हजर करु मात्र, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात येईल तसेच आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. भिडे आणि एकबोटे यांना अटक होते की नाही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.