पुणे :
‘विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे पुण्यात ‘रुरल इंडिया ‘ या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी होणार आहेत . पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात ७ ते ९ नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे . राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज चे संचालक विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे . गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ ),आदिनाथ चव्हाण (संपादक ,ऍग्रोवन ) हे मान्यवरही उदघाटन कार्य्रक्रमात उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक असलेले ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हा टाटा ट्रस्ट्स चा एक सामाजिक उपक्रम आहे .
‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर ,सल्लागार अजित कानिटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे . परिषदेच्या उदघाटन सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे .
गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ),श्रीजित मिश्रा हे मान्यवर सहभागी होणार आहेत . परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे १५० तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत .
ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले जाणार आहे . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले जाणार आहेत. शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस चर्चा होणार आहे .