‘लायन्स क्लब ऑफ़ पुणे औंध -पाषाण’ च्या वतीने ‘दिवाळी अंक : अपेक्षा आणि अपेक्षाभंग ‘ विषयावर आयोजित परिसंवादाला शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
दिवाळी अंक ही साहित्यकर्मी घडविण्याची कार्यशाळा :राजन खान
पुणे : ‘लायन्स क्लब ऑफ़ पुणे औंध -पाषाण’ च्या दिवाळी अंक परिसंवादात ‘दिवाळी अंक -अपेक्षा आणि अपेक्षाभंग ‘ या विषयावर चर्चा रंगली
दिवाळी अंक ही साहित्यकर्मी घडविण्याची कार्यशाळा असे राजन खान यांनी सांगितले तर
दिवाळी अंकांनी वैश्विक आव्हाने पेलावीत अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली .
महाराष्ट्र साहित्य परिषद् सभागृह, टिळक रोड, पुणे येथे हा कार्यक्रम सायंकाळी झाला.
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सतीश देसाई (अध्यक्ष : लायन्स् क्लब ऑफ पुणे औंध – पाषाण) हे होते.
डॉ. अनिल अवचट, राजन खान, ह. मो. मराठे, अरुण जाखडे, संजय भास्कर जोशी हे वक़्ते या परिसंवादात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले ,’सातत्य आणि सांस्कृतिक लोकशाही या दिवाळी अंकांच्या परंपरेच्या जमेच्या बाजू आहेत ,मात्र ,केवळ रंजन आणि जाहिरातींसाठी दिवाळी अंक असावेत का ,याचा विचार झाला पाहिजे . दिवाळी अंकात विश्वात्मक जाणिवा उमटणे आवश्यक असून संपादकांना विश्वाची आव्हाने शोधण्याची क्षमता असली पाहिजे ‘
’राजन खान म्हणाले ,’दिवाळी अंक ही साहित्यिकांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना घडविणारी कार्यशाळा आहे . या दिवाळी अंकातील साहित्यात रुक्षपणा येत असून त्यातून मानवी ओलाव्याचे लेखन आले पाहिजे . साक्षेपी संपादकांची पिढी हरवली आहे . त्याचबरोबर मराठी भाषा शिकण्याची आच संपत असून मुद्रितशोधनही मागे पडत आहे . अशा अनेक आव्हानांवर विचारविनिमय करण्यासाठी केवळ दिवाळी अंक या विषयावर दोन दिवस संमेलन होण्याची गरज आहे .
अरुण जाखडे म्हणाले ‘समाज वाङमयविन्मूख होत आहे आणि आस्वादक्षमता कमी होत आहे ,अशा काळात वाचनशरणता पत्करून उपयोग नाही तर सकस दिवाळी अंकच काढला पाहिजे . एखादा दिवस अंक उशिरा प्रकाशित झाला तर वितरकांनी तो शिळा झाला असे समजू नये . मराठी बुक सेलर पेक्षा बुक मर्चंट तयार व्हायला हवेत .
ह .मो . मराठे म्हणाले ,’दिवाळी अंकांबद्दलची उत्सुकता कायम आहे . तरी दहा वर्षानंतर काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही . दिवाळी अंकात ललितेतर साहित्य वाढत आहे आणि पुरस्कार वाढले तरी दर्जेदार अंक निघत नाहीत . ‘
डॉ अनिल अवचट म्हणाले ,’पूर्वी संपादक आणि लेखकात दिवाळी अंकामुळे नाते निर्माण व्हायचे ,तसे आताही झाले पाहिजे . जुन्या -नव्याचा संगम घडवून जाहिरातींची फिकीर न करणारे काही दर्जेदार अंक निर्माण झाले पाहिजेत आणि सुसंकृत समाजाने ते उचलून धरले पाहिजेत ‘
संजय भास्कर जोशी म्हणाले ,’नामवंत दिवाळी अंकांनी ठरवून नवोदितांना संधी दिली पाहिजे आणि नव्या अंकांमध्येच नामवंतांनी लिहिले पाहिजे . वाचन ही गोष्ट जगण्याच्या केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत ‘
डॉ . सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले . रवी चौधरी यांनी स्वागत केले तर प्रदीप बर्गे यांनी आभार मानले
साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते