पुणे :नॅशनल वॉटर लिटरसी मिशन’ करण्याची, नदी खोरेनिहाय जलसंसद स्थापन करण्याची, नद्यांवरील अतिक्रमणे-प्रदूषण-शोषण दूर करण्याची मागणी
जलबिरदारी आयोजित ‘राष्ट्रीय जलसाक्षरता’ संमेलनात करण्यात आली.
‘जलबिरादारी’च्या वतीने समन्वयक नरेंद्र चुघ, संघटक सुनील जोशी, पुणे जिल्हा संघटक विनोद बोधनकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलन’ विजापूर येथे दि. 16 ते 18 ऑगस्टदरम्यान पार पडले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डॉ. राजेंद्रसिंह आणि 30 राज्यातील 15 हजार जलयोद्धांची उपस्थिती या संमेलनाला होती. देशभरातून 101 जलसाक्षरता यात्रांचा समारोप या संमेलनात झाला.
भीमाशंकर ते पंढरपूर-विजापूर या ‘नमामि चंद्रभागा’ जलसाक्षरता यात्रेचा समारोपही या संमेलनात झाला.
संमेलनातील चर्चेवर आधारित ‘विजापूर घोषणापत्र’ जाहीर करण्यात आले असून, त्यावर सर्व राज्यांच्या विधानसभा, विधान परिषद, नीती आयोग येथे चर्चा व्हावी अशीही मागणी ’जलबिरादारी’च्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात जलसाक्षरता केंद्र सुरू करून त्याद्वारे 50 हजार जलयोद्धे, जलसेवक प्रशिक्षित करावे, असेही त्या पत्रकात म्हटले आहे.
या संमेलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते विनोद बोधनकर (पुणे) यांना ‘जलऋषी’ सन्मान देवून गौरविण्यात आले. बोधनकर यांनी जलसारक्षरता, जलसंधारण क्षेत्रात 30 वर्षे योगदान दिले असून, त्यांचा गौरव मानपत्र देवून करण्यात आला.
’दुष्काळमुक्त आणि पूरमुक्त भारत’ हे ध्येय ठेवून पुढील कृतिकार्यक्रम या संमेलनात ठरविण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.