मुंबई:होय मी आहे कंत्राटी मुख्यमंत्री , मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतलेय , गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट घेतलेय ..असंगांशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा अशा विविध वाक्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा अगदी खरपूस संचार आज विधानसभेत बोलताना केला .
ते म्हणाले,’आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही गद्दारी केली नाही, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटलं. असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, तुम्ही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना लगावला. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आज कंत्राटी मुख्यमंत्री असा करण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या घटनेचा आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आणि उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांवर टीका केली.
रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरुन टीका केली. पण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कोणी काही बोललो नाही. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी डॅशिंग काम केलं. पण आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला. मग अशा माणसाला भेटायला जायचं तर रांग का बघायची?”
एक से भले दो, आता आम्ही दोघे आहोत
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरुन उरायचे. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन असं म्हणायचे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मलासुद्धा घेऊन आले. आता तर आम्ही दोघे आहोत, ‘एक से भले दो’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.विरोधी पक्षाच्या लोकांनी राज्यामध्ये सरकारने काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात मांडलं पाहिजे. अजित पवार रोखठोक बोलतात. आम्ही शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत पाच हजारावरून 15 हजार केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षाने हलकं फुलकं वातावरण करायचं असतं, पण तुम्ही आम्हाला बोचंल असं बोलत होता असं मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना उद्देशून बोलले.आम्ही गद्दारी केली नाही…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. काँग्रेसला जवळ करायचं नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी मोठी गर्दी झाली असती का?”.यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतकाँग्रेसवरही शिंदे यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून एक कविता ऐकवत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत खोचक टिप्पणी केली.एकेकाळी इंदिराजींच्या काँग्रेसची होती किती वट
आता टोमणेसेनेसोबत होतेय नुसती फरफट, एकनाथ शिंदे म्हणाले की, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, नाना पटोले इथे नाहीत, त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही. तसा काँग्रेसचा आधीही प्रॉब्लेम होताच. बाळासाहेब थोरात विचारायचे काय चालू आहे. मग मी माझ्या हातात काही नाही, माझ्या हातात असतं तर तुमच्यासाठी काहीतरी केलं असतं, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी सभागृहात एक कविता वाचून दाखवली.
काँग्रेसची स्थिती पाहून येते दया,
महाविकास आघाडीची पुरती गेली रया,
दादा आणि अंबादास बसले,
काँग्रेसवाले हात चोळत बसले,
एकेकाळी इंदिराजींच्या काँग्रेसची होती किती वट
आता टोमणेसेनेसोबत होतेय नुसती फरफट, अशा आठवले स्टाईल कवितेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले.दरम्यान, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांनाही एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. हो मी कंत्राटी मुख्यंमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लगावला.