शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक
पंढरपूर -कोणत्याही स्थितीत पंढरपूर कॉरिडोर होऊ देणार नाही, असा इशाराच भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला.तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर आव्हान देऊ नये. अन्यथा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा घरचा आहेर सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला.पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पंढरपुरात सुब्रमण्यम स्वामी यांनी नागरिकांची भेट घेत पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांचा नेमका विरोध का आहे? हे समजून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात सर्व देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल मंदिर आहे. कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा आधी सरकराने विकास करायला हवा.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात विमानतळ होणे गरजेचे आहे. कारण देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. येथील चंद्रभागा नदी अतिशय प्रदुषित झाली आहे. आधी तिची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थानिकांवर कॉरिडॉर लादत आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. याचा समाचार घेताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, प्रकल्पाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावाराज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबाबत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आलेले आहे. हे अनैतिक आहे.