मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या १६२ आमदारांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळखपरेड झाली. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला. याशिवाय कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्राच्या हिताचा संकल्प आपण सर्वांनी केला. केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी काही राज्यात बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली. कर्नाटक, गोवा आणि मणिपुरातही तेच केलं. संसदीय बाबी ज्या आपण करतो त्या सर्वांना हरताळ फासला जात आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे होत आहे. चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन केली, त्या ठिकाणी काही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. तर काहींचे निकाल लागले आहेत. सुप्रीम कोर्टाचा ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी आपली बहुमत सिद्ध करण्याची तयारी असेल. आम्ही एक महिन्यापूर्वीच गटनेते पदाची निवड केली, पण अजित पवार तिकडे गेले. त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना व्हिपचा अधिकार आहे, याची भीती नवीन सदस्यांना दाखवली जात आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्याला सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी स्वतः जबाबदारी घेतो. कुणीही संभ्रमात पडू नये. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. इथे काहीही खपवून घेतलं जात नाही. आपण योग्यला योग्य म्हणतो, जे योग्य नसताना लादण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आता आपल्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे धडा शिकवण्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही,’ असं शरद पवार म्हणाले.
‘सत्यमेव जयते हे वाक्य आपल्याला सत्तामेव जयते होऊ द्यायचं नाही. हे दृष्य (समोर बसलेले आमदार) पाहूनही जर कुणाच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल, तर तिन्ही पक्ष मिळून प्रकाश पाडण्याची हिंमत आपल्या मनगटात आहे. पुन्हा येईन म्हणणार नाही, आम्ही आलेलो आहोत. मध्ये आलात तर काय करायचं ते करण्यासाठी समर्थ आहोत. आडवं येण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर करुनच पाहा. शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्याचीही आमची तयारी आहे. हात-पाय मारण्याचा जो केविलपणाचा प्रयत्न चाललाय, त्यामुळे आम्ही अजून घट्ट होऊ. आमदार फक्त खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या शक्तीला मातीत गाडण्याची सुरुवात आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातून करत आहोत’, असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी दिला.