लोकशाही संपली आहे असे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावे
-देशात बेबंदशाही सुरू झाली आहे हे मोदींनी जाहीर करावे
– बाळासाहेबांनी पुजलेलं धनुष्यबाण आमच्याकडे आहे
–निवडणूक आयोगाने शपथ पत्रे मागविण्याचे थोतांड का केले ?
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे. लोकाशाही संपवून बेबंदशाहीला सुरुवात केली आहे. आजपर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिलेलं आहे, जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. न्याययंत्रणा सरकारच्या दबावाखाली याबाबत गेले काही दिवस केंद्रीय कायदा मंत्री बोलत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलताहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार पाहिजे. त्यामुळे देशातील लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत, असं बोलण्याचं धाडस सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवलं पाहिजे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे अनपेक्षित आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.आजचा हा जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, तो अत्यंत अनपेक्षित आहे. कारण जवळपास सहा महिने ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही निकाल देऊ नये, अशी आमची मागणी होती. पक्ष कोणाचा बरोबर आहे, कोणाच्या बरोबर आहे? हे जर का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवायला लागतो तर मात्र कोणही धनाढ्य माणूस निवडून आलेला आमदार, खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हेही मी मागे बोललो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.