मुंबई-सुप्रियाताई महाराष्ट्रातील सोसासट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले, असा तिखट सवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.भाजपकडून महाराष्ट्रातले उद्योग पळवण्यात आले. आता सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप सुप्रिया सुळे केला होता. त्याला भाजपकडून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुळेंचा आक्षेप काय?
देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे प्रसिद्ध श्री महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले आहे. शिवपुराण, शिवलीलामृतात त्याचे पुरावेही आहेत. मात्र आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हे “भीमाशंकर ज्योतिर्लिंग’ त्यांच्या राज्यात असल्याचा दावा केला आहे. महाशिवरात्रीचा सण 18 फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या पर्यटन विभागाने तेथील डाकिनी टेकडी, कामरूप या ठिकाणी हे देवस्थान असल्याच्या जाहिरातही सर्वत्र प्रकाशित करून भाविकांना या मंदिराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत टीका केली होती.
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी ट्विट करून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यात ट्विटमध्ये सुळे म्हणतात की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!
सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे.पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी ?
मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली होती.
जबाबदारीची अपेक्षा ठेवावी का?
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेच्या भडिमाराला भाजपमधून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? #मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.