मुंबई-सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. ‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मी व्यथित आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी एका निवेदनातून दिली.
यात फडणवीस म्हणाले की, ‘मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हतं आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे.’
‘आमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कठीण परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करुन ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकवले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत’, असे फडणवीस म्हणाले.