मुंबई, दि. ५ नोव्हेंबर- साहित्य संमेलनामध्ये अशा प्रकारे शाई फेकण्याच्या प्रकाराचे समर्थन करता येणार नाही. असे होता कामा नये. परंतु क्रियेला आलेली ही प्रतिक्रिया आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार रविवारी घडला. त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकारचे लिखाण करण्याची काय आवश्यकता आहे. स्वतःला जे विचारवंत समजतात, आपल्या लिखाणाने जातीय तेढ निर्माण होणार नाही, लोकांची दैवते आहेत त्यांचा अपमान होणार नाही, त्यांच्या भावनांना ठेच लागणार नाही याची काळजी सुजाण समजणाऱ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि स्वभाविकपणेआपण लेखणीने वार करतो. छत्रपती संभाजी राजे यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे मावळे आहेत त्यांनी आक्रमकपणे जे काही केले ते समर्थनीय नसले तरीही ती क्रियेला प्रतिक्रिया होती असेच म्हणावे लागेल. भविष्यात समाजाला दिशा देणारे काम पत्रकाराचे असते. हे पत्रकार असतात, लेखक संपादक हा त्याहून महत्त्वाचा असतो. आपल्या लेखणीतून ते इतिहास उभा करत असतात, भविष्याला दिशा देत असतात. लिखाणातून विद्वेषक काही होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि ती या प्रकरणात घेतलेली दिसत नाही. सनसनाटी निर्माण करून काहीतरी लिहिणे यावर ही क्रियेला प्रतिक्रिया आली आहे.