औरंगाबादः देशातील कोट्यावधी गोरगरीब आपले घर गाठण्यासाठी हजारो किलोमीटरची पायपीट करत आहेत, चालून दमलेल्या अनेकांनी रस्त्यातच आपले प्राण सोडले, तर कुणाला खायला मिळाले नाही जीव गमवावा लागला. हे सगळे चित्र दिसत असतांना, पोटाला दोन घास नाही म्हणून गरीब माणूस मरतोय, अशा परिस्थितीत सरकार वीस लाख कोटींच्या गप्पा कसल्या मारता? आधी रस्त्याने पायी निघालेल्या कुटुंबांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करा, त्यांना खायला पोटभर अन्न द्या, मग मोठ्या गोष्टी करा, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची खिल्ली उडवली. कोरोना संकटामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असलेल्या देशाला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने विविध क्षेत्रांसाठी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ कोणत्या क्षेत्राला कसा व किती होणार? याची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग चार दिवस पत्रकार परिषद घेऊन देशाला दिली. विरोधकांनी या पॅकेजवर टिका केली असतांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पॅकेज म्हणजे मृगजळ असल्याची टिका केली आहे.
आज सामान्य माणूस अन्न पाण्याशिवाय तडफडून मरतोय, त्याच्या पोटाला दोन घासांची गरज आहे. कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नाही, आपल्या राज्यात, घरी परतण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नाही, तो आपल बिऱ्हांड पाठीवर घेऊन कच्च्याबच्यांसह हजारो मैलची पायपीट करतोय. त्याला मदत करणे, जगवणे हे सरकारने प्राधान्याने करायला हवे, पण ते न करता अर्थमंत्री फक्त कोट्यावधींचे आकडे लोकांच्या तोंडावर फेकत आहेत.निर्मला सीतारामन यांनी वीस लाख कोटींच्या पॅकेजची जी माहिती दिली, त्याचे पोस्टमार्टम आम्ही लोकसभेच्या अधिवेशनात निश्चित करू, पण ज्या पध्दतीने, व मुजोरपणे त्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या, हे देशाच्या अर्थमंत्र्यांना न शोभणारे होते. पॅकेज जाहीर करतांनाच देशाला लॉकडाऊनमधून बाहेर कसे काढणार? त्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे, जनतेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत? हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.