पुणे – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच मात्र, ते धर्मवीर ही होते.देव देश आणि धर्मासाठी ते आयुष्यभर झगडले असून संभाजी महाराज नसते तर राज्यात हिंदू उरले नसते. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणणेच योग्य आहे. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा एक प्रकारचा द्रोह आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे देशात एकच ‘जाणते राजे ‘ असून इतर कोणाला ‘जाणता राजे ‘ म्हणायचे असेल तर म्हणू दे मात्र, जनता त्यांना ‘जाणता राजे ‘ म्हणत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृ मंदिर या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम ,मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे ,उपाध्यक्ष महेश आठवले ,कार्यवाहक धनंजय कुलकर्णी ,मुख्याध्यापिका माधुरी बर्वे उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या महिलांच्या संदर्भात राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असून याबाबत राजकारण थांबवले गेले पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या पक्षापासून केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यांचे मत त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रथम ऐकले पाहिजे.कारण खालच्या दर्जाची महिलांबाबतची टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना सोशल मीडियात दिसून येतात. त्यामुळे पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे म्हणणं ऐकले पाहिजे असा टोला त्यांनी यावेळी लागवला.