मुंबई-आधी फक्त गरिबीची चर्चा झाली. मात्र, स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदाच भारत मोठी स्वप्न पाहून पूर्ण करत आहे, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते मुंबईतल्या बीकेसी मैदानावर बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली.
पैसा भ्रष्टाचारात गेल्यास विकास कसा होईल? नरेंद्र मोदींचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुंबईला पैशाची कमतरता नाही. मात्र, पैसा भ्रष्टाचारात गेल्यास विकास कसा होईल? पैसा बँकांमध्ये पडून राहिल्यास विकास कसा होणार, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर सत्ता हवी. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास विकास वेगाने होईल, असा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा होतेय की, जगालासुद्धा भारताच्या मोठमोठ्या संकल्पांवर विश्वास वाटतोय. यामुळेच भारताच्या नवनिर्माणाची जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे, तेवढाच जगालाही विश्वास वाटतोय. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच दावोसचे वर्णन केले, पण हे जगात सगळीकडे घडते आहे. कारण भारत आज आपल्या सामर्थ्याचा सदुपयोग करत आहे. भारत वेगवान विकास आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या बाबी करत आहे.
जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था आज बेहाल,पण अशा कठीण काळातही कुणाच्या घरातील चूल विझू दिली नाही…
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज देशात एकीकडे घर, टॉयलेट, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, रुग्णालये, आयआयएम अशा सुविधांचा विकास गतीने होत आहे, तर दुसरीकडे, आधुनिक कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चरही तयार होत आहे. जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था आज बेहाल आहेत, पण अशा कठीण काळातही भारत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना मोफत रेशन देऊन कधीही त्यांच्या घरातील चूल विझू देत नाहीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. ते म्हणाले, मुंबईच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. थोड्या वेळ्यापूर्वी मुंबईच्या फूटपाथ दुकानदारांच्या खात्यात पैसा जमा झाला. असे लाभार्थी आणि मुंबईकरांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आज भारत आज मोठे स्वप्न पाहतो आहे आणि ते पूर्ण करण्याचे धाडस करत आहे. गेल्या काळात आम्ही गरिबीची चर्चा करणे, दुसऱ्याकडून मदत मागणे यातच आमचा वेळ गेला.
मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दावोसमध्ये जर्मनीचे काही लोक भेटले. सौदीचे काही लोक भेटले. त्या साऱ्यांनी मोदींचा उल्लेख केला. मोदींच्या नावाचा दावोसमध्ये डंका होता. हा आमचा गौरव आहे, असे कौतुकोदगार त्यांनी काढले. शिंदे पुढे म्हणाले की, काही लोकांना काँक्रिटचे रस्ते नको आहेत. त्यामुळे त्यांची दुकाने बंद होतील अशी त्यांना भीती आहे. मात्र, विरोधकांना टीका करत राहू द्या. आम्ही विकास करत राहू. महाविकास आघाडीच्या काळात योजनांचा श्वास गुदमरल्याचा आरोप त्यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींना पाहताच पवित्र भाव निर्माण होतो. त्यांचे व्यक्तिमत्व खास आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात सुर्वणअक्षरांनी नोंद करावी अशी आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. त्या सेवेचा त्यांच्याच हस्ते लोकार्पण होणे हा दैवी योग आहे. महाराष्ट्राचे लोक भाग्यवान आहेत. ज्यांनी घोषणा केली. त्यांच्याच हस्ते शुभारंभ होतो आहे.एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांची इच्छा होती हा कार्यक्रम मोदींच्या हातून होऊ नये. मात्र, नियतीपुढे कोणाचेही चालत नाही. मात्र, ही मुंबईकर आणि जनतेची इच्छा होती. समृद्धी महामार्गाचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते झाला. आता या नव्या प्रकल्पाचे मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा अभूतपूर्व सोहळा आहे.एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे मुंबईत समृद्धी दाखल होतेय. मेट्रोच्या रूपाने दुसरे स्वप्न साकार होतोना आपण पाहतोय. बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे वेगळे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा त्यांच्यातला समान धागा होता. त्याला विकासाचा पाया होता. मोदी या कार्यक्रमाला आले, त्यांना मनापासून धन्यवाद देतो.
काही लोकांनी बेईमानी केली, स्वतःची घरे भरली
बीकेसी मैदानावरील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसमध्ये राज्यासाठी १ लाख कोटींचे उद्योग आणले. पंतप्रधान तुम्ही सर्व ठिकाणी लोकप्रिय आहात. लोकप्रियतेची कोणती स्पर्धा झाली, तर त्यात मुंबई नंबर एक असेल. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला बहुमत दिले. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धाडस केले आणि हे सरकार आले. आता महाराष्ट्राचा विकास जोरदार होतोय.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारण कसे असते. कोविड काळात पंतप्रधानानंनी सर्वांचा विचार करत स्वनिधीची रचना केली. मात्र, महाराष्ट्र सरकरच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत हा निर्णय राज्यात लागू करायचा नाही, असा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही एक बैठक घेतली. एक लाख फूटपाथ दुकानादार, फेरीवाल्यांना निधी देण्याचा निर्णय घेतला. आता तो आकडा सव्वालाखावर गेले आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले तुम्ही ज्या-ज्या योजनांची घोषणा केली. त्याच्या उदघाटनालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतात. हे नवे कल्चर तुम्ही आणले. त्याबद्दल आभार. मुंबईसारखे हे महत्त्वाचे शहर. आम्ही दूषित पाणी कसलिही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले. मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स डिपॉझिट करून स्वतःची घरे भरली. मात्र, मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही.