अमरावती -राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती. दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
अमरावतीत झालेल्या हिंसाचारची घटना दु्र्दैवी आहे. 12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो मोर्चा चुकीच्या माहितीतून काढला गेला. त्रिपुरामधे जे घडलेच नाही ते झाल्याचे दाखवून हा हिंसाचार घडवण्यात आला. जी घटना घडलीच नाही ते जनतेत घडल्याचे दाखवून अल्पसंख्याक समाजाच्या भावना भडकवण्यात आल्या.महाराष्ट्रात अराजकता तयार झाली पाहिजे, दंगे झाले पाहिजेत अशा मानसिकतेततून तयार केलेला हा कट होता का? याची चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 12 तारखेला जे काही घडले, जो हिंसाचार झाला त्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
कुणाच्या परवानगी मोर्चा निघाला
12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो कुणाच्या परवानगीने निघाला? किती लोकांना त्यात संमती देण्यात आली होती? का परवानगी देण्यात आली होती? हे सगळे स्पष्ट झाले पाहिजे. सरकारने ते सांगितले पाहिजे. असे फडणवीस म्हणाले. हा मोर्चा परतत असताना जे काही घडले ते दंगे, हिंसाचार घडावा या उद्देशाने करण्यात आले.विशिष्ट धर्माच्या लोकांची दुकाने फोडण्यात आली. आता राज्यकर्ते 12 तारखेची घटना पुसून टाकण्याचा प्रयत्न करून, 13 तारखेला जे घडले तेच पुन्हा पुन्हा सांगत आहेत. 13 तारखेला घडलेली घटना ही देखील चुकीचीच होती. आम्ही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.
आम्ही गप्प बसणार नाही
चुकीच्या घटनेसाठी जर लांगुलचालन होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आधी न घडलेल्या घटनेवरून हिंसा घडवून आणायची दुसऱ्या दिवशी त्याचे रिअॅक्शन आल्यानंतर फक्त दुसरा दिवस काय घडले तेच बघायचे. हे चालणार नाही. जे लोक या हिंसाचारात नव्हते त्यांनाही यात गोवण्यात येते आहे. एका महिलेने मला सांगितले की, माझा मुलगा फक्त गाडी घराच्या आतमधे घेऊन येत होता.मात्र नंतर त्याला नेऊन त्याच्यावर कलम 307 लावण्यात आले. हा इतका मोठा गुन्हा होता का? हे न तपासता त्याला अटक झाली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. टार्गेट करून आणि याद्या तयार करून तरूणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. असाही आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
12 नोव्हेंबरची घटना डिलिट करून 13 तारखेच्या घटनेत जे लोक सहभागी झाले तेवढेच पाहिले जात आहे. जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. त्यामुळे या कारवाईचा आम्हाला निषेधही करावा लागेल. जर अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील. असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.