पुणे, -पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पुणे शहराचा पाणी-प्रश्न बिकट झाला असा आरोप पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंदशिंदे यांनी केला असून या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील नागरिक अशा नियोजनशून्य
उमेदवाराला निवडून देणार काय? असा सवाल केला आहे. तर अनिल शिरोळे यांची उमेदवारी का डावलली ? समाज म्हणून कि निष्क्रिय म्हणून याचे उत्तर द्यावे असा सवाल माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी, पुण्यातील पाणीपुरवठ्याबाबत पुणे महापालिकेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेतले. पाणी-पुरवठ्याबाबत कसलेही नियोजन केले नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आणि आता तर उन्हाळ्यात पाण्याअभावी नजीकच्या काळातच पुण्याला दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.
पुणे महापालिका आणि राज्याचे सिंचन खाते यांच्यात समन्वय नसल्याने शहरात कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया गेले, महापौरांसारख्या जबाबदार पदाधिकाऱ्याला पाणीपुरवठ्यासाठी उपोषणाचे नाटक करावे लागले शिवाय संबंधित समितीतून बाहेर पडावे लागले हे बापट यांच्या
भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभाराचेच प्रत्यंतर आहे असे सांगून शिंदे म्हणाले, धरण-साठ्यातील पाण्याचे नियोजन न केल्यामुळे नजीकच्या काळात पुणेकरांना भीषण पाणी-टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अशा नियोजनशून्य उमेदवाराला निवडून द्यायचे काय? हाच महत्वाचा
प्रश्न आज पुणेकर नागरिकांना पडला असेल असेही ते म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट जे काही करतात त्यामुळे पुण्याचे नुकसानच होते त्यामुळे पुण्याचे यापूर्वीचे खासदार अनिल शिरोळे हे निष्क्रिय होते तेच बरे होते अशी सार्वत्रिक भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे असा टोलाही
अरविंद शिंदे यांनी शेवटी लगावला.
- अनिल शिरोळे यांची उमेदवारी का डावलली ? बहुजन म्हणून कि निष्क्रिय म्हणून-बापट साहेब उत्तर द्या
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पुण्यात झालेल्या सरदार वंशजांच्या मेळाव्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे निधर्मी राजे होते असे मोठ्या अभिमानाने सांगितले मात्र त्यांचा भारतीय जनता पक्ष खरोखरच निधर्मी पक्ष आहे याचे त्यांनी मतदानापूर्वी उत्तर द्यावे असे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच सरदार वंशजांनी भाजपाला पाठिंबा दिलेला नाही असा दावाही त्यांनी यावेळी
केला. पुण्याचे यापूर्वीचे खासदार अनिल शिरोळे हेही सरदार घराण्यातील आहेत मात्र यावेळी त्यांना ते बहुजन समाजाचे असल्याने की ते निष्क्रिय असल्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारली याचाही बापट यांनी खुलासा करावा असे ते म्हणाले. प्रशांत जगताप यांनी यावेळी गिरीश बापट यांच्याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले व त्याबाबत त्यांनी खुलासेवार उत्तरे द्यावीत असे आवाहन केले. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट
आणि जेम्स लेन प्रकरणात बापट यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटचे समर्थन केले याचा अर्थ जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी केलेले लेखन बापट यांना मान्य आहे की याचा बापट यांनी खुलासा करावा अशी त्यांनी मागणी केली. लालमहाल प्रकरणातील दादोजी कोंडदेव
पुतळा तोडफोड प्रकरणात आरोपी असलेल्या फक्त भाजप नगरसेवकांवरील गुन्हे मागे घेतले मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांवरील गुन्हे मात्र कायम ठेवले बापट यांनी हा पक्षपात का केला याचाही खुलासा करावा असे ते म्हणाले. कोथरूडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यात निघालेल्या मराठा मूक मोर्च्यांची ‘निव्वळ स्टंटबाजी’अशी संभावना केली तसेच त्यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, गिरीश बापट यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात आता ‘ब्राह्मणराज्य’ आले आहे अशी मल्लिनाथी केली त्यांचे हे मत बापट यांना मान्य आहे काय? याचा त्यांनी खुलासा करावा असे त्यांनी सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्याबाहेर शिवसृष्टी उभारण्यास राज्य शासनाने तीनशे कोटींचा निधी मंजूर केला मात्र आता त्याच्या बाजूलाच थीम पार्क उभारण्यात येत आहे त्यामुळे शिवसृष्टीचे महत्व कमी होणार नाही काय? याचेही बापट यांनी मतदानापूर्वी उत्तर द्यावे असे जगताप यांनी म्हटले आहे.