मुंबई : महाराष्ट्रासमोरचे प्रश्न अनेक आहेत. ते पूर्णत: सुटलेले नाहीत. आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्न मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठठलरूप मानत त्यांच्या विकासाच्या वारीत मी सहभागी झालो, असे भावूक उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी `मी पुन्हा येईन/ नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी/ जलयुक्त शिवारासाठी/ दुष्काळ मिटवण्यासाठी/ युवामित्रांना शक्ती देण्यासाठी कवितेच्या ओळी सादर केल्या.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका कवितेने भाषणाचा समारोप केला.
मी पुन्हा येईन..
याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन..
गावांना जलयुक्त करण्यासाठी,शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..
मी पुन्हा येईन….
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
मी पुन्हा येईन….
याच निर्धारानं,याच भूमिकेत,याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवं रूप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
दरम्यान विरोधी बाकांसह सर्व सदस्यांनी त्यांच्या या उदगाराची प्रशंसा केली. संविधानाला सर्वोच्च महत्व देत शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करत मी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेलाच देव मानले असे फडणवीस म्हणाले. आजही महाराष्ट्र सर्व राज्यात अग्रणी असलेले राज्य आहे. ते पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या `कदम मिलाके चलना होगा’ या काव्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, की मी प्रत्येकाला समवेत घेवून चाललो. दुष्काळ मिटवण्याचे प्रयत्न केले. गुंतवणूक खेचून आणली, विदर्भातला अनुशेष दूर करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्रीनिधीचा वापर रूग्णांच्या मदतीसाठी करण्यास प्रारंभ केला. शेतीचे प्रश्न सोडवले असेही ते म्हणाले.