पुणे- माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. हा निर्णय मलाही पटलेला नाही. हा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयावर सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सांगतानाच काही लोक आता या विषयावर राजकारण करत असून केंद्राकडे बोट दाखवत आहेत. खरेतर हा राज्याचा कायदा आहे. त्यामुळे केंद्राचा संबंध येतोच कुठे?, असा सवालही त्यांनी केला.