पुणे : बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही ‘नुरी’ लढत वाटत होती. बारामतीत मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सगळ्या अफवा आहेत. घाव करायचा तर तो मुळावरच अशा शब्दांत ही लढत मैत्रीपूर्ण नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत स्पष्ट केले.
बारामतीमध्ये युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल,बाबुराव पाचर्णे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शाह म्हणाले, बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही ‘नुरी’ लढत वाटत होती.पण असे काहीही नाही. या लढतीत कोणतीही तडजोड नसून बारामतीत भाजपाच येणार आहे.यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पवार, राहुल गांधी,मायावती, उमर आणि फारुख अब्दुल्ला हे एकत्र बसले. कारण त्यांना भारत आणि काश्मीर यांचे वेगवेगळे पंतप्रधान करायची इच्छा आहे.परंतु,आम्ही जिवंत असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही.आम्ही जेएनयूमध्ये देश विरोधी बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले.तर राहुल गांधी त्यांना भाषास्वातंत्र्य आहे म्हणत भेटायला गेले. मी त्यांना सांगू इच्छितो,राहुल बाबा तुम्हाला देशद्रोह्यांशी ईलू ईलू करायची असेल तर करा, आम्ही करणार नाही.
अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
• बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण नाही, अशा अफवा होत्या म्हणूनच सभेचे नियोजन नसतानाही कार्यकर्त्यांना बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे.
• घाव घालताना मुळावरच घालायचा म्हणूनच बारामतीची जागा जिंकण्यासाठीच ही लढाई आहे.
• देशातील घराणेशाही संपविण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे.
• नरेंद्र मोदी यांनी गरीबी पाहिली व अनुभवली आहे, त्या मुळे तेच खऱ्या अर्थाने गरीबी दूर करु शकतात, पाच पिढ्या व 55 वर्षे राजकारण करणाऱ्या गांधी परिवाराला गरीबी हटविणे जमणार नाही.
• देशात 50 वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात दहा वर्षे मंत्री असलेल्या शरद पवार यांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला हे सांगावे, भाजप युवा मोर्चाचा युवक पवारांशी चौकात चर्चा करायला तयार आहे.
• मनमोहनसिंगांच्या काळात शेतकऱ्यांना 1 लाख 15 हजार कोटींचे अर्थसहाय्य दिले गेले, मोदींनी हाच आकडा 4 लाख 38 हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवला.
• प्रगतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचा शरद पवारांनी विकास केला की त्याला खाली खेचले असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला.
• जे कुटुंबाचे भले करण्याच्या मागे आहेत ते देशाचे भले करु शकणार नाहीत म्हणून मोदींचे हात बळकट करा असे आवाहन शहांनी केेले.
• पवार कृषीमंत्री असताना कच्ची साखर आयात करत होते, मोदींनी आयात थांबविली त्याचा उसउत्पादकांना फायदा झाला, इथेनॉलचे दरही वाढवून दिल्याने कारखानदारी बळकट झाली.
• लोकसभेची निवडणूक संपली की पुरंदर विमानतळाचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याची विजय शिवतारे यांना अमित शहा यांची ग्वाही दिली.
• आम्ही न मागताही पाच वर्षांचा हिशेब दिला आहे, शरद पवार आपण काय केल याचा हिशेब द्यावा असेही शहा म्हणाले.
• बारामतीकर आपण मतदार आहात, मतदार म्हणून आपण पवारांना विकासाचा हिशोब मागायला नको का असा प्रश्न शहांनी उपस्थित केला.
• मनमोहनसिंगाचा उल्लेख मौनीबाबा करत मोदी सरकारने घुसखोरी थांबवून देश सुरक्षित केला, मनमोहनसिंगांनी घुसखोरी व हल्ले होताना उफ देखील निघाले नाही अशी टीका.
• दहशतवाद्यांबरोबर चर्चेचा आग्रह राहुल गांधी व शरद पवार करतात हे योग्य आहे का असा बारामतीकरांना अमित शहांचा सवाल.
• गोळी आली तर गोळ्याने आम्ही उत्तर देऊ, ईट का जबाब पत्थर से देऊ, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
• देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे कॉंग्रेसने जाहीर केले आहे, आम्ही सत्तेवर येताच एक एक घुसखोर शोधून त्याला देशाबाहेर घालविण्याचे काम करु.
• राहुल गांधी व शरद पवार या देशाचे संरक्षण करु शकतात का, असा बारामतीकरांना अमित शहांचा जाहीर सवाल.
• गेल्या वेळेस महादेव जानकरांना कमळ चिन्ह न देण्याची चूक यंदा सुधारली आहे, कांचन कुल खासदार झाल्यास त्याचा हिशेब आपण पाच वर्षानी येऊन देऊ अशी ग्वाही.