पुणे- महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका विद्या बाळ यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार दीप्ती चवधरी,नगरसेविका नंदा लोणकर,माधुरी सहस्रबुध्दे, मंजुश्री खर्डेकर, स्मिता वस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या ,’विद्या बाळ यांनी स्त्री चळवळीत ठसा उमटवला. स्त्रियांच्या शोषणाविरुध्द आंदोलने केली. परंतु ही चळवळ केवळ स्त्री मुक्तीची न होता स्त्री वादी कशी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला. स्त्रियांचे मूलभूत हक्क, अधिकार आणि महिलांच्या शोषणाविरोधात त्यांनी लढा दिला. विद्याताईंनी तमाशा कलावंतांच्या प्रश्नांपासून सर्वसामान्य महिलांचे प्रश्न अभ्यास करून समाजासमोर मांडले. स्त्रियांना स्वत्वाची जाणीव करुन देण्याचे काम त्यांनी केले. स्त्री शिक्षित झाली पाहिजे यासाठी विद्याताईंचा आग्रह होता असे गौरवोद्गार महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी काढले.
विद्या बाळ म्हणाल्या ,‘आनंद, संकोच, कृतज्ञतेने स्वीकारते. समृध्द शहरात जन्मलो व काम करू शकलो अशा शहराच्या महापालिकेने पुरस्कार दिला ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या नावाने हा पुरस्कार दिला ते लाखमोलाचे आहे. सावित्री आणि ज्योतीबा फुले माझ्या चळवळीतील मायबाप आहेत. ज्यांना मी आई-वडिल मानले त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार लाखमोलाचा आहे. पुरस्कार कधीच एकट्या व्यक्तीचा नसतो. आजवरच्या वाटचालीत छोट्या मोठ्या कामात बरोबर असणार्या सर्वांचा हा पुरस्कार आहे.
आमच्याकडे स्त्रीला स्थान आहे, आमच्याकडे स्त्री मुक्ती चळवळीची गरज नाही असे काही संस्कृती रक्षकांचे मत आहे. परंतु पुरुषांच्याबरोबरचा सन्मान तिच्या वाट्याला आलेला नाही. महिलांना माणसासारखे जगता येत नाही. त्यासाठी शिक्षण देणे महत्वाचे हे ज्योतिबांचे विचार आहेत. अजूनही बाई माणूस आहे असे अजूनही काही जणांना वाटत नाही. पुरुषांसारखे विकास शोधत चालता आले पाहिजे हे बायांना पटलेले नाही. पुरुषांना पण कळले नाही.
फुले,, शाहू, आंबेडकर नाव घेतली जातात. पण सावित्रीबाई यांचे जीवन माहिती नाही. स्त्रियांना खूप काही मिळाले पण सर्व काही मिळाले नाही ते पुरुषांनी द्यायचे नाही. स्त्रियांचे स्वातंत्र्य सर्वांनी मान्य करायचे आहे. स्त्री-पुरुष चळवळ पुढे नेणार्या विचाराला, तत्वाला मान्यता देणारा हा पुरस्कार आहे म्हणून आनंद आहे.
एक लाख रुपयांचा पुरस्कार असल्याचे जाहीर झाले. सरकारने असे ठरवले एक लाख रुपये नाही द्यायचे. आम्ही भांडणार नाही. हा विद्या बाळांचा अपमान नाही. पण सावित्रीबाईंचा अपमान आहे. त्याचा निषेध नोंदवावासा वाटतो. एक लाख रुपये मला नको होते. सभोवती काम करणार्या लोकांना वाटण्यासाठी या पैशाचा उपयोग झाला असता, अशी खंत व्यक्त केली. पुरुष नगरसेवकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहाणे आवश्यक होते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
महापालिका वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सत्कार करते. मीरा भाईंदर येथील एका नागरिकानं पीआयएल दाखल केली. त्यावर हायकोर्टाने अशा प्रकारचे खर्च करता येणार नाही. असे शासनाला आदेश दिले. त्यामुळे शासनाने अशाप्रकारचे आदेश दिले. पनवेल येथील महापालिका परिषद झाली. या परिषदेत शासनाला पत्र देणार आहोत. प्रत्येक शहराचे वैशिष्ट्य असते. सांस्कृतिकपण हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शासन व हायकोर्टाला तसे पत्र देणार आहोत. असे स्पष्टीकरण महापौरांनी केले.
डॉ. अनिल अवचट म्हणाले,
विद्या बाळ यांचा सत्कार तत्कालिक नसून, त्यांनी आजवर केलेल्या कामाचा सत्कार आहे. मला स्त्रियांच्या प्रश्नांशी अगत्य आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यात पुरुष मारहाण करतात, शिव्या देतात हे सोसून संसार करते. वाईटपणापासून मुलांना वाचवते. तिने साठवलेले पैसे दारुसाठी वापरतो. उपचारासाठी मुला बाळांना घेऊन परत येते. इतके मोठे मन स्त्रिचे असते. खंबीरपणे उभ्या राहतात. फुले दाम्पत्यांने केलेले कार्य अचाट आहे. हे काम आता कोठे आहे. ज्या बायका शिकल्या ते कोठे आहेत. आता काय परिस्थिती झाली. सर्व सुधारणा उपभोगवादाने गिळली की काय अशी शंका येते. नटवेपणाकडे आपण गेलो आहोत. ज्यांनी इतर स्त्रियांशी काम करायचे त्या कॅटवॉकवर चालत आहेत. वासनेला सिमा आहे का नाही. समाज नियंत्रण असते. उपभोग घेण्याची वाढत चालली आहे काय. आपल्या स्त्रिकडे आपण कसे पाहातो याचा विचार करावा. समान अधिकार, इज्जत देतो का हा विचार करावा. त्याबाबतीत आपण मागे आहोत. क‘ूर झालो आहोत. त्यामुळे विद्या बाळांसारखे स्त्री चळवळीतील काम महत्वाचे वाटते.
स्त्रिया व्यसनात नव्हत्या. समाजाचे बंधन आहे ते बरे आहे असे म्हणायचो. परंतु स्त्रियांच्या व्यसनाधिनतेसाठी आम्हाला वॉर्ड काढावा लागलो. आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. विद्या बाळांची चळवळ स्त्रीवादी नसून अनुरूपवादी आहे. पुरुष व स्त्रियांनी एकमेकांच्या उणीवा भरून काढल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या स्त्रिच्या स्थानाकडे निर्भिडपणे पाहावे असे वाटते.
नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे यांनी परिचय व आभार प्रदर्शन केले. मंजुश्री खर्डेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. नंदा लोणकर यांनी सूत्रसंचालन केले.