१० कोटीच्या बेंच घोटाळ्याकडे का हो दुर्लक्ष ? स्थायी समिती अध्यक्षांसह आयुक्तांना सवाल …आता संदीप खर्डेकरांनीहीवेधले लक्ष
पुणे-स्थायी समिती चे सदस्य उमेश गायकवाड यांनी ‘माय मराठी ‘ द्वारे पालिका करत असलेल्या बेंच खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आता या घोटाळ्याकडे भाजपचे नेते संदीप खर्डेकर यांनी हि लक्ष वेधणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे . आता तरी स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यांना जाग येणार काय ? या प्रकरणांची चौकशी करून दोषींना शासन होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . सुमारे १० कोटीचा हा घोटाळा उमेश गायकवाड यांनी १७ मे रोजी उघडकीस आणला होता.
(हि बातमी पहा या यु ट्यूब लिंक वर https://www.youtube.com/watch?v=t77R5dfn9iQ ) किंवा http://mymarathi.net/local-pune/pmc-news-235/ येथे …
आजपर्यंत त्यावर स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्त यांनी काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही .
दरम्यान या प्रकरणी काल भाजपचे स्थानिक नेते संदीप खर्डेकर यांनी आता आवाज उठविला आहे .त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना याप्रकरणी पत्र दिल्याचे सांगितले आहे . या पत्रात त्यांनी काय म्हटले आहे ते जसेच्या तसे वाचा …
प्रति,
मा. सौरभ राव,
आयुक्त पुणे मनपा ,
विषय – डी एस आर दराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करणेबाबत / तसेच पूर्वगणनपत्रक व निविदेतील प्रचंड तफावतीबाबत ….
मा महोदय,
मनपा तील एस्टीमेट कमिटीच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे दरपत्रक निश्चित केले जाते व त्यानुसार निविदा काढून सदर वस्तू खरेदी केल्या जातात. हीच पद्धत विविध विकास कामांबाबत ही अवलंबिण्यात येते व त्यानुसार कामांच्या निविदा काढण्यात येतात.
मात्र अनेक वस्तूंचे डी एस आर ( DISTRICT SCHEDULED RATES) व बाजारातील दर यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते.याबाबत विचारणा केली की ” वेगवेगळ्या दर्जाचे साहित्य असते व त्यामुळे वेगवेगळे दर असतात अशी मखलाशी केली जाते ” आणि बाजारात स्वस्तात मिळणार माल महागड्या दराने खरेदी करून अनेकांचे हित साधले जाते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर आमच्या भागात (कर्वेनगर हैप्पी कॉलोनी एरंडवणे ) नागरिकांच्या सोयीसाठी सुंदर बाक/ बेंच खरेदी करण्यात आली. सदर बेंच विमानतळावर असतात तसे सुंदर आहेत व नागरिकांना त्याचा उपयोग होतो आहे.मात्र मी अध्यक्ष असलेल्या बँकेसाठी मी अश्या प्रकारच्या बेंच ची खरेदी केली असता मला एक बेंच ६००० रुपयास पडला तर मनपा ने बेंच १०५०० रुपयास खरेदी केला (डी एस आर कडे बोट दाखवत )
खुल्या बाजारातील वितरकाने मला सांगितले कि हे बेंच तीन प्रकारचे येतात यात २६ किलो चा बेंच ३५००,२९ किलो चा ४५०० आणि ३१/३२ किलो चा ५५०० हजारात देतो.दर्जा ही उत्तम व जागेवर पोच,तसेच बसवून ही देणार (म्हणजे जमिनीत चारही पाय रोवून त्यास सिमेंट काँक्रेट ने फिक्स करणार ) तसेच हजार पेक्षा जास्त नग घेतल्यास भरघोस डिस्काउंट देऊ असे सांगण्यास ही तो विसरला नाही.हे एवढे स्वस्त उपलब्ध असताना मनपा चे दर एवढे चढे कसे ?
तसेच कळीचा मुद्दा असा की प्रत्येक कामाचे पूर्व गणन पत्रक मनपा तर्फे तयार केले जाते,म्हणजे एखादा रास्ता डांबरीकरण किंवा पदपथ करणे किंवा खोल्या बंधने याचे दरनिश्चित करून त्याप्रमाणे निविदा काढली जाते,म्हणजेच एखादे काम १ कोटीचे आहे असे ठरविल्यावर जेव्हा निविदा ३०% ते ३५% कमी दराने भरली जाते तेव्हा संशय निर्माण होतो की हे परवडते कसे? एक कोटीचे काम भाववाढ,,व्याज,ओव्हरहेड्स,रिटें शन हे सगळे गृहीत धरून ६०/६५ लेखाला कसे परवडू शकते ? काहीतरी चुकतंय एवढे नक्की, तरी याबाबत निश्चित खुलासा करावा व बेंच च्या दराची व दर्जाची तपासणी करावी आणि खरेदीप्रक्रियेची चौकशी करावी अशी आग्रही मागणी करत आहे.तसेच सर्व डी एस आर दरांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी ही मागणी करत आहे.
संदीप खर्डेकर,
अध्यक्ष क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो ९८५०९९९९९५