‘पिफ २०२२‘मध्ये ध्वनी संयोजक राकेश रंजन यांचे मत
पुणे, दि. ७ मार्च – आशयाप्रमाणे ध्वनी संयोजन झाले पाहिजे. तुमच्याकडे तंत्र आणि साधने आहेत, म्हणून त्याचा स्वैर उपयोग करू नये, असे मत प्रसिद्ध ध्वनी संयोजक राकेश रंजन यांनी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ २०२२) चित्रपटाचे ध्वनी संयोजन या विषयावर रंजन बोलत होते. चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, डॉन स्टुडिओचे संचालक हेमंत गुजराथी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.
राकेश रंजन म्हणाले, “स्क्रिप्ट लिहितानाच ध्वनीचा विचार व्हायला हवा. चित्रपटातील लेखन दृकश्राव्य माध्यमात रुपांतरीत करण्याचे काम तंत्रज्ञान करत असते आणि त्यात ध्वनी संयोजन महत्त्वाचे असते. ध्वनी संयोजन हा सर्जनशील भाग असतो. तो कथेला पुढे नेत असतो. त्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरले पाहिजे आणि त्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी योग्य बजेटही ठेवले पाहिजे.”
प्रेक्षकांना जोडणारा तोच चांगला ध्वनी असतो. मोठा आवाज म्हणजे चांगला ध्वनी नव्हे, असे सांगून रंजन म्हणाले, की चित्रपट हे बनवा आणि फेकून द्या अशी गोष्ट नसल्याने त्यातील ध्वनीला महत्त्व आहे. ध्वनी संयोजन करताना संगीत, शांततेचा वापर महत्त्वाचा असतो. संगीत हे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते आणि शांतता परिणामकारक असते. आपल्या आजूबाजूला अनेक ध्वनी असतात पण ते सगळेच चित्रपटात येत नसतात. हे सगळे आले तर गोंधळ होईल त्यामुळे कथेच्या आशयाप्रमाणे ध्वनी संयोजन हवे. ध्वनी संयोजन करताना खूप सर्जनशीलपणे अभिनव प्रयोग केले पाहिजेत.
ध्वनी संयोजन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलताना रंजन म्हणाले की गुणवत्तेला पर्याय नसतो, हे लक्षात ठेऊन ध्वनी संयोजन केले पाहिजे.
ऍनॅलॉग ते डिजिटल हा आपला प्रवास सांगून राकेश रंजन यांनी आपल्या ध्वनी संयोजन केलेल्या चित्रपटांच्या ध्वनी-चित्रफिती दाखवल्या आणि सत्यजित रे आणि अनेक दिग्दर्शकांच्या सांगितल्या.