मुंबई-
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेला आमचा विरोध आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. शिवसेना असेल किंवा काँग्रेस सोबत आम्ही जायला तयार आहोत. आता त्यांनी ठरवायचे आहे काय करायचे ते. मागे उद्धव ठाकरे यांच्या सोबत मातोश्रीवर भेट झाली पण युतीची चर्चा झाली नाही. आम्ही कोणाची बी,सी टीम नाही. आम्ही आमचे मालक आहोत. आम्हाला जर भाजप सोबत जायचे असेल तर कोणी अडवू शकत नाही. आम्हीच स्वतःला अडवले आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दांवर भाष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना फसवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. जुना मागासवर्गीय आयोग संपवून नवीन सुरू केला, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने पुन्हा ओबीसींना फसवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. मी मुद्दाम कारस्थान हा शब्द वापरतोय. जुना मागास आयोग संपवुन नवीन मागासवर्ग तयार करत आहेत. मागचा अहवाल जो सुप्रीम कोर्टात दाखल केला तो कोर्टाने कचऱ्याच्या टोपलीत टाकला. जो अहवाल 18 मुद्यावर पाहिजे होता. अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.
ओबीसी अहवाल फसवा
ग्रामपंचायतमध्ये ओबीसी जागा किती, त्या भरल्या की नाही. त्यातील किती क्रिमिलीअर मधून भरल्या आहेत. बिहारमधील पिछडा आणि अती पिछडा वर्गवारी केली आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने थांबवले नाही. लोकसंख्येच्या आधारावर जे बॅकवर्ड ठरविण्यात आले आहेत. नव्या आयोगाच्या नोटीफिकेशन आलेला आहे त्यात या मुद्यांचा उल्लेख नाही. तो फसवा आहे. कोर्ट निर्णय देत नाही असा प्रचार चार पायाचे पक्ष करतील. त्यात भाजप ही आहे. याचा आम्ही निषेध करतो. जो पर्यंत ही तयारी होत नाही तोपर्यंत कोर्ट ही स्थगिती उठवेल असे वाटत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हनुमान चालिसाने टार्गेट करण्याचा प्रयत्न
हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुसलमानांना टार्गेट केले जात आहे. कर्नाटकच्या मुस्कानचा सत्कार आम्ही औरंगाबादमध्ये घेण्याचे ठरवले होते. पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. असे आंबेडकर म्हणाले.