सातारा-गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, त्यांचं अनेक वेळा डिपॉझिट जप्त केलं आहे, कशाला बोलायचं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या विरोध करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आता स्वतः शरद पवार यांनी याविषयावर भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
शरद पवार यांना धनगर आरक्षणाचे फक्त राजकारण करावयाचे आहे. त्यामुळे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे बेताल विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली असून ती पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे अजेंडा नाही, भूमिका नाही आणि व्हिजनदेखील नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकावयाचे, त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि त्यांच्यावरतीच पुन्हा अन्याय करण्याची नेहमी भूमिका राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भाजपला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, यावर अनेक चर्चा झाल्या, मात्र शरद पवारांनी नंतर भूमिका बदलली असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पुढे ते म्हणाले होते की, दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी होती. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार हा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार असतील. तरीही शिवसेनेला सोबत घेऊनच चालावं लागेल असे पंतप्रधान मोदींनीकडून स्पष्ट सांगण्यात आले होते. जर काँग्रेसला बाजूला ठेवायचे असेल तर शिवसेनेला सोबत घेणे गरजेचं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना निरोप दिला होता की, जर शिवसेना नसेल तर आम्ही तुम्हाला घेत नाही.