मुंबई-सीमावादावरून कर्नाटकात झालेल्या तोडफोडीचे आज मुंबईत पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातली वाहने अडवून काळ्या रंगाच्या स्प्रेने नंबरपाट्या रंगवल्या. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.कर्नाटक सीमावादाचे संसदेतही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रश्नी बोलावे, अशी मागणी केली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे संसदेत सीमाप्रश्नी चर्चेची मागणी केली.
सीमावर्ती भागातील जत तालुक्यातल्या गावांनी आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आणि राज्यात पुन्हा एकदा सीमावाद पेटलाय. त्यानंतर अक्ककोट, पंढपूर, नांदेड ते थेट सुरगाणा तालुक्यापर्यंत याचे लोण पोहचले. इथल्या अनेक गावांनी मुलभूत सोयी-सुविधांसाठी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटक दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये म्हणून दौरा रद्द केल्याची भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली. मात्र, त्याच दिवशी कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या वतीने महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.
मुंबईत पडसाद
सीमावादाच्या प्रश्नाचे आज मुंबईत तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाची वाहने थांबवून त्यांना काळे फासले. कानडी वाहनांच्या नंबर प्लेट काळ्या रंगाचा स्प्रे मारून मिटवल्या. तसेच वाहने थांबवून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे नवी मुंबई ते कळंबोली दरम्यान वाहतूक गती संथ झाली.