पहिली नोट बंदी, नंतर अवकाळी पाऊस, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाची आचार संहिता ,अशी एका मागून एका संकटाला तोंड देत असताना चालू वर्षी “करोना”सारख्या महामारीने कला क्षेत्रावर मोठा अघात केला आहे. जत्रा-यात्रेत ढोलकी आणि हलगीवर कडाडणारी बोटं स्थिरावली.. पिसारा फुलवून मोरासारखे थुई थुई नाचणारे पायातील चाळ थबकले.. बतावणीतून विनोद करून लोकांना हास्याचे फवारे उडवायाला लावणारे सोंगाड्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लोप पावला.. कलेसाठी झोकून. देणारे जीवनमान बंद पडलेल्या पेटी सारखे बेसूर झाले. तमाशातील गण गवळण सुरू झाल्यावर”घ्या दूध,घ्या दही, घ्या लोणी”म्हणाऱ्या राधा, गवळणी कृष्ण, पेंद्या, अशी पात्र साकारणाऱ्या लोककलावंतावर सध्या खऱ्या जीवनात रस्त्यावर उतरून “घ्या केळी.. घ्या फळं.. घ्या बोंबील घ्या सुकट” अशी विकण्याची वेळ आली आहे.तरी अजून ही करोनाच्या वक्रदृष्टी सापडलेल्या लोककलावंतावर सांस्कृतिक कार्य खात्याने चार महिने झाली तरी अद्याप कृपादृष्टी का दाखवली नाही. हे एक बारीवरच्या सवाल-जवाब सामन्याप्रमाणे पडत चाललेलं कोडं आहे.
दि.१मे २०२० रोजी आपला महाराष्ट्र हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.अशा या राज्यातील लोककलावंताचे महाराष्ट्राच्या जडघडणीत मोठे योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो.. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो.. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळ.. लोककलावंतानी यामध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे.अनेक लोककलावंतानी वगनाट्य, भारुडातून जनजागृती करून समाजाला डोळे उघडायला लावले.
मात्र करोनाच्या घट विळख्यात सापडलेल्या लोककला क्षेत्रावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यावर कधी नव्हे बेकारीची कुऱ्हाड कोसळली. चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ हे तीन महिने कलावंतांसाठी सुगीचे दिवस असतात.कला ही आमची शेती आहे.आज तीच शेती नापिक झाल्यासारखी वाटत असल्याने आत्महत्या करायची वेळ आम्हावर आली आहे.असे तमाशा क्षेत्रातील कलावंतांचे स्पष्ट मत आहे.आजारपण, मुलांचं शिक्षण, हंगामा पुर्वी सावराकडून घेतलेलं कर्ज, त्याचे व्याज अशा संकटात फड मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे लोक कलाकार अडचणींत सापडला आहे.
ग्रामीण भागतील लोककला म्हटली की, आजही डोळ्यासमोर उभा राहतो आणि रसिकांना पटकन समजला जातो तो रांगडा तमाशा. पण ही कला गावोगावी सादर करताना अनेक वेळा गावातील गावगुंडा पासून अमानुष छळ होतच असतो. त्यांच्या मनाप्रमाणे नाही वागले की, कनाती फाड, गाड्यावर दगड फेक कर, नृत्यागना याचा छळ कर . असे अनेक प्रसंगाला तोंड दयावे लागते.तरी खचून न जाता दरवर्षी पुन्हा नव्या उमेदीने हे कलाकार आपल्या पोटासाठी चार पाच महिने घरदार,आपली लेकरं बाळ सोडून गावोगावी भटकत राहतात. गेल्यावर्षी दि २५ एप्रिल २०१९रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका गावात हरिभाऊ बढे नगरकर सह शिवकन्या बढे यांच्या तमाशातील गाव गुंडानी नर्तिकांची चक्क छेड काढली.पुरुष कलाकारांना अमानुष मारले.कसेल पोलीस संरक्षण नाही. आरोग्याची हमी नाही. आर्थिदृष्ट्या सक्षम नाही. तरी समाधानात राहणारा हा कलावंत आज डोळ्यात अश्रू आणून रड आहे.पण अद्याप सरकारमधील प्रमुखांना तातडीने याची दखल घ्यावी वाटली नाही. सर्वात मोठी झळ ही तमाशा कला क्षेत्राला पडली आहे. तमाशा हा असा एकच मोठा पक्ष आहे की, गावात बारा पक्ष असेल तरी सर्व पक्षांचे लोकं फक्त तमाशाच्या तंबूत एकत्र येतात.सर्व पक्षाला एका तंबूत आणण्याची ताकद फक्त तमाशा फडात आहे.म्हणूनच प्रेक्षक हाच आपला मायबाप आहे.आज तो दुरावला असल्याची खंत या कलाकारांमध्ये आहे.मग आता खऱ्या अर्थाने लोककलेला आता राजश्रयाची गरज वाटते.
दि २३मार्च २०२० रोजी देशात लॉकडाउन झाल्यानंतर कमाईच्या हंगामात राज्यातील सर्वच लोक कलाकारांचा रोजगार बुडाला.घेतलेल्या सुपाऱ्या रद्द झाल्या,उपासमारीची सुरुवात झाली.त्यामुळेच अनेक कलावंतांनी आपल्या जिविकेचे साधन आपणच शोधलं आहे. शासनाकडे तरी किती मागायचं.आताच्या काळात शासनाकडे सगळेच मागणारे आहेत.सामाजिक संस्था तरी किती मदत करणार.शेवटी आपला मार्ग आपणच शोधावा.आता कलेवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. अशाही काही कलवांताच्या भावना आहे.म्हणूनच काही कलावंतांनी फळं, भाजीपाला,बोंबील,सुकट विकायला सुरुवात केली आहे.
तरीही राज्य सरकारला या लोक कलावंतांचे उत्तरदायित्व नाकारु चालणार नाही . कारण हे अचानक आलेले संकट हे आज हया कलावंताना पेलवणारे नाही. करोडो रुपयांची मालमत्ता असणारे फिल्मी कलाकार या लॉकडाऊन काळात मानसिक तणावाखाली येवू जर आत्महत्या करीत आहेत., हे तर लोककलावंत आहेत. त्यांच्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे.मग त्यांनी काय दशा झाली असावी. याची कल्पना करवत नाही. आता याचा मार्ग सरकारला दाखवावा लागेल. कारण करोना सारखी महामारी ही कोणा व्यक्तीमुळे आली नाही. तर ही जागतिक समस्या म्हणून पुढे आली आहे.त्यामुळे सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.खिसा रिकामा असला तरी चालेल.पण समोरची जागा रिकामी नसावी.या धुंदीत जगणारा हा कलावंत असतो.त्यांना अर्थ नियोजन कशाला म्हणतात,हे माहित नसते. शेवटच्या श्वासापर्यंत कलेशी प्रमाणिक राहणे हा त्यांच्यात सर्व संपन्न गुणभाव असतो. आज तो संकटात म्हणजे त्याचे सारे कुटुंब संकटात आले आहे.म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागांच्या प्रमुखांनी खूप सुईत दोरा ओवावा, येवढ्या बारीक नजरेतून न बघता शक्य तेवढे लवकर महाराष्ट्रातील लोक कलाकाराला आर्थिक मदत केली पाहिजे.त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.कारण हे लोककला क्ष्रेत्र असंघटीत आहे.”एक जत्रा आणि पुढारी सत्रा”अशी या क्षेत्राची अवस्था आहे.म्हणून अनेक शासकीय योजना पासून हा गरीब वर्ग दूरच राहिला आहे.म्हणून त्यांना आधाराची गरज आहे.याबद्दल दुमत नाही. आज महाराष्ट्रातील विविध कला प्रकार आणि कला पथकांची संख्या पाहिली तर वीस ते पंचवीस कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची गरज भासणार नाही.किंवा त्यामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट होणार नाही.सांस्कृतिक कार्य खात्याला सहानुभूतीने या समस्याकडे बघावे लागेल.
(राज्यात विविध कला प्रकार असून अंदाजे खालीलप्रमाणे कला पथकांची संख्या असू शकेल.)
सर्व साधारण माहितीनुसार १)पूर्ण वेळ तमाशा फड- १४ते १५ आहेत.२)हंगामी तमाशा फड- ९० ते १००आहेत.३) शाहीरी पथके- १७५ आहे, ४) खडीगंमत संच – १३५ ते १५० आहे. ५) दशावतार संच – ५० ते ५५, ६)भारुड पथके – ५० ते ७५
७) संगीतबारी कला पथके – ४५० ते५०० अंदाजे संख्या.८) आदिवासी कला पथके – एक हजार अंदाजे.९) लोकप्रबोधत्मक कला पथके – ५५० (कला प्रकार समावेश- जागरण गोंधळ पार्टी ,सामाजिक जनजागृती करणारे कला पथके, विविध प्रकारचे वाजंत्री,
खंडूराज गायकवाड
संपर्क ९८१९०५९३३५
Khandurajgkwd@gmail.com