मुंबई-ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालायत उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला विनोद खन्ना यांना गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खन्ना यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण तरीही प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते.
त्यानंतर त्यांचा ‘हिरो’ म्हणून प्रवास सुरुच झाला. २०१५ मध्ये आलेला ‘दिलवाले’ हा त्यांनी काम केलेला अखेरचा सिनेमा. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलर लॉन्चला खास बिग बींनीही हजेरी लावली होती. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते.
१९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे पंजाबमधील गुरुदासपुरचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.