मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारनं प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून प्रसार रोखण्यासाठी आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारकडून जीआर काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.
साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
सकाळी ७ ते सकाळी ११ चार तास हीच दुकाने सुरू
राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकानं (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकानं आणि शेती संबंधिची दुकानं, पाळीव प्राण्याची खाद्य दुकानं सकाळी ७ ते सकाळी ११ अशा केवळ चार तास सुरू ठेवता येणार आहेत.वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकांच्या वेळांबाबत निर्णय घेता येणार आहे.
काय राहणार बंद?
राज्यात १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे कायम असणार आहेत.
राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील
शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील
क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार
धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना देखील परवानगी नाही.
विवाहासाठी केवळ २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी
अंत्यसंस्कारासाठी केवळ २० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील