दिल्ली – देशातील कोटी-कोटी जनतेने या फकीरची झोळी भरली अशी प्रतिक्रिया पीएम नरेंद्र मोदींनी आपल्या विजयी भाषणात दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून नोंदवण्यात आलेला मतदानाचा हा सर्वात मोठा आकडा होता. 42 अंश सेल्सिअसच्या उन्हात सुद्धा लोक मतदानासाठी बाहेर पडले. ही मतदारांमध्ये झालेली जागरुकता आहे. लोकशाहीमध्ये विश्वास वाढवणारी व्यवस्था पुरवणे आणि अतिशय यशस्वीरित्या निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगासह यासाठी कामावर लागलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद असे मोदींनी म्हटले आहे.
महाभारताचे दिले उदाहरण
मोदींनी आपल्या विजयाचे वर्णन करताना महाभारतातील एका प्रसंगाचे उदाहरण दिले. महाभारतात कृष्णला विचारण्यात आले होते की तुम्ही कोणत्या पक्षात आहात. त्यावेळी भगवान श्री कृष्ण म्हणाले होते की मी हस्तिनापूरच्या पक्षात आहे. त्याचप्रमाणे देशातील जनतेने कुठल्याही पक्षाच्या समर्थनात नव्हे, तर या देशाच्या समर्थनात आम्हाला मतदान केले. असे मोदींनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हे आमच्या सरकारने गेल्या 5 वर्षांपासून केलेल्या कामांची पावती आहे असे भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून यात भाजप आणि एनडीए जवळपास 300 जागा मिळवण्याकडे कूच करताना दिसून येत आहे. भाजपला सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवून देणारे पीएम नरेंद्र मोदींनी दिल्लीत सभेचे आयोजन केले. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाजपला सर्वात मोठा विजय पीएम मोदींनी मिळवून दिला. याबद्दल मोदींसह समस्त भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार असे शहा यांनी म्हटले आहे.
जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन
जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांचे आभार मानले.
दूरध्वनीवरील संवादात दोन्ही नेत्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा उल्लेख केला आणि शांती, प्रगती आणि समृद्धीबाबत असलेला समान दृष्टिकोन साध्य करण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.पुढल्या महिन्यात ओसाका इथे होणाऱ्या जी-20 देशांच्या परिषदेत होणाऱ्या भेटीसाठी दोन्ही पंतप्रधान उत्सुक आहेत.
यावर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी भारतात येणाचे आमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांना दिले आहे.
जगनमोहन रेड्डींना दिल्या शुभेच्छा
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने विजय मिळवला. त्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेस 147 ठिकाणी आघाडीवर आहे. 2014 मध्ये चंद्रबाबू नायडूंची तेलुगू देसम पार्टीला बहुमत मिळाले होते. राज्यात बहुमतासाठी 175 पैकी 88 जागेंची गरज आहे.