पुणे, : तब्बल 4197 वीजखांबांची वीजवितरण यंत्रणा जमीनदोस्त करीत पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव व मुळशी, वेल्हे तालुक्यांमध्ये अंधार पसरविणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या अभुतपूर्व तडाख्यावर मात करीत महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे या भागातील आतापर्यंत 6 लाख 27 हजार 100 (99 टक्के) वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महावितरणच्या मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागामध्ये वीज वितरण यंत्रणेला प्रथमच एवढ्या प्रमाणात अस्मानी तडाखा बसला. दुर्गम, अतिदुर्गम भागात घनदाट जंगलातून, डोंगरदऱ्यांतून गेलेल्या वीजयंत्रणेमधील 4197 वीजखांब चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाले होते. परिणामी 862 गावे, वाड्यावस्त्यांमध्ये अंधार पसरला होता. सुमारे 5 लाख 29 हजार 900 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच कृषीपंप व इतर वर्गवारीतील 1 लाख 1 हजार 600 असे एकूण 6 लाख 32 हजार 930 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या तिनही विभागातील 47 उपकेंद्र, 389 उच्चदाब वाहिन्या आणि 16586 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे आव्हान स्वीकारून महावितरणचे 168 अभियंते, 599कर्मचारी आणि 59 कंत्रादारांच्या 634 अशा एकूण 1401 मनुष्यबळावर यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते.
कोरोना विषाणूमुळे मनुष्यबळाच्या कमतरतेसह विविध अडचणी तसेच ग्रामीण भागातील दुर्गम व डोंगरदऱ्या तसेच संततधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत 862 पैकी 843 गावे, वाड्यावस्त्यांमध्ये वीजपुरवठा सुरु झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 26 हजार 700 (99.4 टक्के) घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच 1 लाख 400 (98 टक्के) कृषीपंप व इतर ग्राहकांसह एकूण 6 लाख 27 हजार 100 (99 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. यामध्ये 1194 पैकी 1184 लहानमोठ्या पाणीपुरवठा योजना, 209 पैकी 204 मोबाईल टॉवरचा देखील समावेश आहे. सध्या लघुदाब वितरण यंत्रणेची दुरुस्ती सुरु असून अतिदुर्गम 19 वाड्यावस्त्या, आदिवासी पाडे तसेच सर्व वर्गवारीतील 5800 वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.
मावळ, मुळशी व जुन्नर या डोंगरदऱ्या व दुर्गम भागात लोकवस्ती असलेल्या तालुक्यांमध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात वादळाचा तडाखा बसतो. मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने या तिनही तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा नेस्तनाबूत करून टाकली होती. महावितरणचे अविश्रांत दुरुस्ती काम, स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी व इतर शासकीय यंत्रणांनी दिलेले सहकार्य आदींमुळे आव्हानात्मक असलेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अभूतपूर्व ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या आव्हानाला तोंड देत महावितरणने पुन्हा एकदा वीजग्राहकांना प्रकाशमान केले आहे.