साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
मुंबई, दि. १ ऑगस्ट – साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपले साहित्य आणि शाहीरीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचे जाज्वल व तेजस्वी विचार जगभरातील जनमाणसांत पोहचावेत या भावनेतून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आज त्यांची जयंती साजरी केली जात असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
चेंबूर येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे येथील उद्यानातील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास विरोध पक्ष नेते दरेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले. त्यामुळे त्यांचे केवळ समाजासाठी नव्हे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या, साहित्य परदेशात सुद्धा प्रसिद्ध असून त्या साहित्यावर अभ्यास केला जात आहे. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात मानाचे स्थान आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कविता आणि अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे आजही अभिमानाने गायले जात असून महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.